भारतीय रेल्वे विभागाने राजस्थानातील जोधपूरहुन पाकिस्तानातील कराचीला जाणारी थार एक्स्प्रेस रद्द केली आहे. आता ही रेल्वेसेवा पुढील आदेशापर्यंत बंदच राहणार आहे. या अगोदर पाकिस्तानने शुक्रवारी थार एक्स्प्रेस सेवा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

याशिवाय भारत सरकारने जम्मू-काश्मीरला लागू असलेले कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तानकडून भारताबरोबरचे व्यापारी संबंध तोडण्याची घोषणा करण्यात आली. तसेच, समझौता एक्स्प्रेस देखील रद्द करण्यात आली आहे.
१८ फेब्रुवारी २००६ रोजी सुरू झालेली थार एक्स्प्रेस दर शुक्रवारी रात्री जोधपूर ते कराची जाते. या अगोदर देखील ही रेल्वे सेवा अनेक वर्षे बंद होती. दोन्ही देशांमध्ये झालेल्या करारानुसार सहा महिने पाकिस्तानची रेल्वे चालवली जाते जी कराचीहून भारतातील बाडमेरमधील मुनाबावपर्यंत येते.

ही रेल्वे सेवा राजस्थान सीमेलगतच्या नागरिकांमध्ये लोकप्रिय आहे. शिवाय पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या हिंदूंना भारतात येण्यासाठी ही रेल्वे विशेष आवडते. अंदाजे १३ वर्षांमध्ये चार लाखांपेक्षा अधिक प्रवाशांनी या रेल्वे सेवेचा लाभ घेतला आहे.