Pm Narendra Modi On RCB Victory Parade Bengaluru Stampede : कर्नाटकातील बंगळुरुमध्ये आरसीबीच्या विजयी परेड दरम्यान चेंगराचेंगरी दुर्घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीच्या घटनेत किमान ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सांगितली जात आहे. तसेच १५ जणांपेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. या घटनेतील जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असल्याची माहिती कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी दिली आहे. दरम्यान, दुर्घटनेनंतर आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. बंगळुरुमधील चेंगराचेंगरी दुर्घटना अत्यंत हृदयद्रावक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदींनी काय म्हटलं?

“बंगळुरुमधील दुर्घटना अत्यंत हृदयद्रावक आहे. या दुःखद घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे, त्यांच्याबरोबर माझे विचार आहेत. या घटनेत जखमी झालेले लवकर बरे व्हावेत, अशी मी प्रार्थना करतो”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

कर्नाटक भाजपाने काय म्हटलं?

आरसीबीच्या विजयोत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेवर प्रतिक्रिया देताना भाजपाने कर्नाटक सरकारवर टीका केली. भाजपाचे नेते बीवाय विजयेंद्र म्हणाले की, “या दुर्घटनेची संपूर्ण जबाबदारी कर्नाटक सरकारने घेतली पाहिजे. जेव्हा संपूर्ण देश कर्नाटक आरसीबीच्या विजयाचा आनंद साजरा करत आहे, तेव्हा कर्नाटक सरकारने कोणतीही पूर्व तयारी न करता विजय रॅली काढण्याची घाई केली. त्यामुळे ही दुर्घटना घडली”, असा आरोप बीवाय विजयेंद्र यांनी केला आहे.

‘या घटनेची न्यायालयीन चौकशी व्हावी’

“तसेच कर्नाटक सरकारने पूर्वतयारी केली नाही, कारण त्यांना फक्त प्रसिद्धीमध्ये रस होता. याचा परिणाम या घटनेत काही लोकांचा मृत्यू झाला. तसेच काही लोकांवर उपचार सुरु आहेत. मी आता काही पीडितांशी बोललो आहे, त्यांनी सांगितलं की रुग्णवाहिकेची सुविधा नव्हती. या घटनेची न्यायालयीन चौकशी व्हावी”, अशी मागणी भाजपाचे नेते बीवाय विजयेंद्र यांनी केली आहे.

नेमकं घटना काय घडली?

आरसीबीच्या विजयी परेडच्या दरम्यान बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये मोठी गर्दी झाली होती. यानंतर स्टेडियमच्या बाहेरही मोठी गर्दी झाली होती. यावेळी गर्दी कमी व्हावी म्हणून पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचं सांगितलं जातं. मात्र, याचवेळी चेंगराचेंगरी झाली आणि किमान ११ जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. तसेच या घटनेत १५ पेक्षा जास्त जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार काय म्हणाले?

“चेंगराचेंगरीच्या घटनेसंदर्भात पोलीस आयुक्तांसी मी बोललो आहे. तसेच आता मी रुग्णालयात जाऊन जखमींशी संवाद साधणार आहे. या घटनेत किती जणांचा मृत्यू झाला हे आत्ता सांगता येणार नाही. आम्ही नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन करत आहोत. आम्ही आरसीबीच्या विजयी परेडचा कार्यक्रम देखील १० मिनिटांत आटोपला आहे. तसेच सर्व परिस्थिती पूर्व पदावर आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत”, असं उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी म्हटलं आहे.