Mallikarjun Kharge on Shashi Tharoor: काँग्रेसचे नेते आणि खासदार शशी थरूर यांनी मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले होते. मोदी यांची ऊर्जा, त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आणि संवाद साधण्याचे कौशल्य यामुळे ते जागतिक स्तरावर भारतासाठी अनमोल व्यक्ती असल्याचे शशी थरूर यांनी म्हटले होते. या विधानानंतर शशी थरूर यांची भाजपाशी जवळीक वाढल्याचे म्हटले जात होते. यानंतर आता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच खरगे यांच्या प्रतिक्रियेनंतर शशी थरूर यांनीही प्रत्युत्तर दिले आहे.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबविले होते. पाकिस्तानशी १२ मे रोजी शस्त्रविराम झाल्यानंतर केंद्र सरकारने संसदेतील सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ विविध देशांत पाठविले होते. या शिष्टमंडळाने विविध देशांमध्ये जाऊन ऑपरेशन सिंदूरचे महत्त्व विशद केले. शशी थरूर शिष्टमंडळातील महत्त्वाचा चेहरा होते.

खासदारांचे शिष्टमंडळ भारतात परतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी जवळपास दीड तास सर्वपक्षीय खासदारांशी मनमोकळ्या अनौपचारिक गप्पा मारल्या होत्या. त्यानंतर काही दिवसांनीच थरूर यांनी मोदींची प्रशंसा केली होती. यानंतर आज मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले असता त्यांना शशी थरूर यांच्या टिप्पणीबद्दल प्रश्न विचारण्यात आला.

यावर मल्लिकार्जुन खरगे यांनी थरूर यांच्यावर कोणतीही कारवाई करणार नसल्याचे म्हटले.

दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना शशी थरूर यांच्याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी उपरोधिक टोला लगावला. ते म्हणाले, मला इंग्रजी भाषा फार कळत नाही. त्यांची (थरूर) इंग्रजी भाषेवर चांगली पकड आहे. त्यामुळचे त्यांना काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यसमितीचे सदस्यपद देण्यात आलेले आहे.”

“ऑपरेशन सिंदूर झाले त्यावेळी संपूर्ण विरोधी पक्ष आणि आम्ही भारतीय लष्कराच्या आणि सैनिकांच्या पाठीशी असल्याचे सांगत होतो. आमच्यासाठी देश सर्वप्रथम आहे. पण आता काही लोक मोदी प्रथम आणि देश द्वितीय असल्याचे म्हणत आहेत. तर आम्ही त्यात काय करणार?”, असा टोला मल्लिकार्जुन खरगे यांनी थरूर यांना लगावला.

शशी थरूर यांच्यावर काँग्रेस पक्ष कारवाई करणार का? असाही प्रश्न यावेळी खरगे यांना विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, लोकांना जे जे वाटते, ते त्यांच्याकडून मांडले जाते. त्यामुळे त्यांनी काय लिहिले, यात आम्हाला काही प्रतिक्रिया द्यायची नाही. आम्ही देशासाठी लढा देत राहू. राष्ट्रीय कार्यकारिणीचे ३४ सदस्य आणि ३० विशेष निमंत्रित सदस्य आहेत. प्रत्येकाचा वेगळा दृष्टीकोन असू शकतो. त्यांनी (थरूर) जे व्यक्त केले, तो त्यांचा वैयक्तिक दृष्टीकोन आहे. आम्ही फक्त देशाला बांधिल आहोत, जर कुणी वेगळे काही मत मांडत असेल तर त्यालाच त्याबाबत विचारले गेले पाहिजे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शशी थरूर यांचा पलटवार

दरम्यान शशी थरूर यांनी एकस्वर एक पोस्ट शेअर करत खरगे यांना प्रत्युत्तर दिल्याचे म्हटले जात आहे. या पोस्टमध्ये शशी थरूर यांनी कुणाचेही नाव घेतलेली नाही. एक पक्ष्याचा फोटो त्यांनी शेअर केला आहे आणि त्यावर लिहिलेला संदेश असा, “उडण्याची परवानगी मागण्याची गरज नाही. पंख तुमचे आहेत आणि आकाश कुणाचेही नाही.”