आगामी लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडी सत्तेत आली, तर पंतप्रधान मोदी यांच्यासह भाजपाच्या नेत्यांना तुरुंगात टाकलं जाईल, असं विधान लालू प्रसाद यादव यांची मुलगी तथा बिहारमधील पाटलीपुत्र मतदारसंघाच्या आरजेडीच्या उमेदवार मीसा भारती यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भाजपानेही त्यांच्या विधानाचा निषेध करत, विरोधकांकडून खालच्या पातळीचं राजकारण केलं जात असल्याची अशी टीका केली आहे.

हेही वाचा – अरविंद केजरीवालांचे वजन घटले नाही, तर १ किलो वाढले? भाजपा नेत्याच्या दाव्याने चर्चांना उधाण!

काय म्हणाल्या मीसा भारती?

मीसा भारती यांनी पाटलीपूत्र येथे माध्यमांशी बोलाताना पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याची तुलना मुस्लीम लीगच्या जाहीरनाम्याशी केली होती. यावरून मीसा भारती यांनी मोदी यांना लक्ष्य केलं.

“इंडिया आघाडीने ३० लाख नोकऱ्या निर्माण करण्याचे, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आणि एमएसपी लागू करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, यात पंतप्रधान मोदी यांना तुष्टीकरण दिसत आहे. ते जेव्हाही बिहारमध्ये येतात, तेव्हा आमच्या कुटुंबावर भ्रष्टाचाराचा आरोप करतात. जर देशातील जनतेने इंडिया आघाडीच्या हातात सत्ता दिली, तर पंतप्रधान मोदींसह भाजपाचे अनेक नेत्यांना तुरुंगात टाकलं जाईल” अशी प्रतिक्रिया मीसा भारती यांनी दिली.

भाजपाचेही प्रत्युत्तर

दरम्यान, मीसा भारती यांच्या विधानानंतर भाजपाने इंडिया आघाडीवर जोरदार पलटवार केला असून इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून अगदी खालच्या पातळीचं राजकारण केलं जात आहे, असा आरोप भाजापाचे नेते विनोद तावडे यांनी केला आहे. तसेच “दहशतवाद्यांना किंवा भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात टाकण्याऐवजी इंडिया आघाडीकडून मोदींना तुरुंगात टाकण्याची धमकी दिली जात आहे. हे दुर्दैवी आहे”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – जिवंत असून लाल बिहारींना करण्यात आलं होतं मृत घोषित, आता नरेंद्र मोदींविरोधात लढणार निवडणूक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मीसा भारती यांच्या विधानावरून टीका केली. मीसा भारती यांनी आधी स्वत:चा आणि स्वत:च्या कुटुंबीयांचा विचार करायला हवा, असे ते म्हणाले. “मीसा भारती आणि त्यांचे कुटुंब विविध प्रकारच्या भ्रष्टाचारात अडकले आहेत. हे आम्ही म्हणत नाही, तर न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले आहे. त्यांनी पंतप्रधान मोदी यांना तुरुंगात टाकण्याची धमकी द्यावी, म्हणजे ही एकप्रकारे लोकशाही आणि न्यायव्यवस्थेची चेष्टा करणे आहे”, असे ते म्हणाले.