लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील मतदान आज पार पडलं. महाराष्ट्रातील मुंबईमधील सहा मतदारसंघ तसेच भिवंडी, नाशिक, दिंडोरी, धुळे, ठाणे, कल्याण या मतदारसंघात आज मतदान पार पडलं. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. लोकसभेची निवडणूक यावेळी महाराष्ट्रात पाच टप्प्यात पार पडली. यावरून ठाकरे गटाचे नेते, आमदार भास्कर जाधव यांनी भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात कितीही सभा घेतल्या असल्या तरी केंद्रातील सरकारच्या हद्दपारीचा मार्ग महाराष्ट्रातूनच मोकळा झाला असल्याची खोचक टीका भास्कर जाधव यांनी केली.

भास्कर जाधव काय म्हणाले?

“माझ्या राजकीय आयुष्याच्या अभ्यासात महाराष्ट्रात कधीही पाच टप्प्यात मतदान झालेलं नाही. त्यामुळे महाराष्ट्रातूनच केंद्रातील सरकार हद्दपार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पंतप्रधान मोदी यांना महाराष्ट्रात जास्तीत जास्त सभा घेण्याची संधी मिळावी, यासाठी महाराष्ट्रात पाच टप्पे ठेवण्यात आले. मात्र, माझ्या मतानुसार जेवढं मतदान लाबलं तेवढं भारतीय जनता पार्टीच्या विरोधात गेलं. कारण भारतीय जनता पक्षांच्या नेत्यांची भाषणाची पातळी ही दिवसागणिक खालावत गेली होती”, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.

हेही वाचा : “जिथे शिवेसनेची मतं आहेत, तिथे..”; संथ गतीने मतदान सुरु असल्याच्या तक्रारींनंतर उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप

“भाजपाचे नेते प्रचारामध्ये मुद्यांपासून भरकटत गेले. ते व्यक्तिगत पातळीवर आरोप प्रत्यारोप करत गेले. कधी कोण मटण खातो, कोण मासे खातो, हिंदूंनी काय करायचं? मुस्लिमांनी काय करायचं? असली पक्ष कुठला? नकली पक्ष कुठला? भटकता आत्मा, अशा प्रकारे पंतप्रधानांनी केलेल्या शब्द प्रयोगामुळे महाराष्ट्रासारखं राज्य आणि त्या राज्यातील जनता दुखावली गेली. जनतेला हे आवडलेलं नाही. देशाच्या पंतप्रधानांच्या तोंडी अशी भाषा हे कोणालाही अपेक्षित नसतं. महाराष्ट्रातील निवडणूक लाबवण्याचं आणि राजकीय फायदा घेण्याचं भारतीय जनता पार्टीचं गणित होतं”, असा आरोप भास्कर जाधव यांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“भाजपाने ४५ प्लस असा नारा महाराष्ट्रात दिला होता. मात्र, निवडणुकीच्या दोन टप्प्यांनंतर भारतीय जतना पक्षाचा जो शब्द प्रयोग केला नाही. त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडी ३५ जागा जिंकेल, असा आमचा अंदाज आहे. निवडणुकीचा अंदाज जो वर्तवला जात आहे. त्यानुसार ४०० पार हा विषय भाजपाने विसरून जावं. ते आता १५० पार करतील की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. इंडिया आघाडी ३५० पार करेल असं चित्र जाणवत आहे”, असं भास्कर जाधव म्हणाले.