Air India Plane Crash in Ahmedabad : अहमदाबाद येथून लंडनच्या दिशेने जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा आज, गुरुवारी दुपारी अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात भीषण अपघात झाला. २४२ प्रवाशांना घेऊन निघालेलं हे विमान उड्डाणानंतर काही क्षणातच कोसळलं. या दुर्घटनेत विमानातील सर्वच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला हे अद्याप समोर आलेलं नाही. विमानाची तपासणी केल्यानंतरच त्याचे कारण स्पष्ट होईल आणि त्यासाठी काही महिने लागू शकतात, असं सांगितलं जात आहे. यापूर्वीही एअर इंडियाच्या विमानाचे अनेकदा अपघात झाले आहेत. यातील बरेच अपघात उड्डाण भरताना किंवा लँडिंग करताना झाल्याची माहिती आहे. दरम्यान, यामागची नेमकी कारणं काय असतात? ते जाणून घेऊ…
जगभरातील विमान अपघातांची आकडेवारी बघितल्यास असं लक्षात येतं की, विमान टेकऑफ किंवा लँडिग करताना बरेच अपघात झाले आहेत. इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या (IATA) २००५ ते २०२३ या कालावधीतील आकडेवारीनुसार, एकूण विमान अपघातांपैकी तब्बल ५३ टक्के अपघात हे लँडिंगदरम्यान झालेले आहेत. तर टेकऑफ करताना झालेल्या अपघाताचं प्रमाण ८.५ टक्के इतकं आहे. टेकऑफनंतरचा प्रारंभिक चढाई टप्पा (initial climb) ६.१ टक्के, तर लँडिंगपूर्वीचा अॅप्रोच टप्पा ८.५ टक्के विमानाच्या अपघातांसाठी कारणीभूत ठरल्याचं दिसून येत आहे. टेकऑफ म्हणजेच उड्डाण भरण्यास अपयशी ठरलेल्या विमानांच्या अपघातांचं प्रमाण १.८ टक्क्याच्या आसपास आहे.
विमान अपघाताची आकडेवारी काय सांगते?
बोईंग कंपनीच्या २०१५ ते २०२४ दरम्यानच्या आकडेवारीनुसार, उड्डाण (टेकऑफ) घेतल्यानंतर सुरुवातीच्या चढाईत जेव्हा विमान जमिनीपासून उंच जाऊ लागते आणि स्थिर होण्यासाठी उंची गाठत असते, त्यावेळी झालेल्या अपघातांचे प्रमाण २० टक्के इतकं आहे. या अपघातांमध्ये आजपर्यंत अनेक प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. विशेष म्हणजे, या दोन टप्प्यांचा एकूण प्रवासातील वेळ फक्त दोन टक्के इतकाच असतो. तर चढाईच्या पुढील टप्प्यात (जिथे विमान स्थिर उंचीवर व वेगात असते) विमान अपघातांची संख्या १० टक्के आहे. तसेच त्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांची संख्याही सर्वाधिक ३५ टक्क्यांच्या आसपास आहे.
आणखी वाचा : भारताच्या ‘ब्रह्मोस’ला रोखण्यासाठी पाकिस्तानचे डावपेच; नेमकी काय आहे जर्मनीची IRIS-T SLM प्रणाली?
उड्डाण किंवा लॅंडिंग करतानाच विमान का कोसळतं?
- उड्डाण भरताना विमानाची गती जास्त असते, त्यामुळे इंजिन पूर्ण क्षमतेने काम करतं. अशावेळी इंजिन फेल झाल्यास अपघाताची शक्यता जास्त असते.
- उड्डाण भरताना विमानात काही बिघाड झाल्यास वैमानिकाकडे निर्णय घेण्यासाठी फार कमी वेळ असतो. कारण, विमान जमिनीपासून फार उंचीवर गेलेलं नसतं.
- उड्डाणावेळी जर वैमानिकाने विमानाचा समोरील भाग खूप उंचीवर नेला, तर विमानाचे पंख पुरेशी ‘लिफ्ट’ निर्माण करू शकत नाहीत, परिणामी विमान खाली कोसळू शकतं.
- पक्षी सहसा जमिनीच्या विशिष्ट उंचीवरच उडत असतात. अशावेळी उड्डाणादरम्यान विमानाच्या इंजिनमध्ये पक्षी शिरल्यास तांत्रिक बिघाड होऊन अपघात होण्याची शक्यता असते.
- अनेकदा विमान उड्डाण भरत असताना पाऊस, वारा, विजा किंवा धावपट्टीवर दृश्यमानता कमी होते, ज्यामुळे विमानाचा अपघात होण्याचा धोका असतो.
- लँडिंग ही विमान उड्डाणातील सर्वात क्लिष्ट प्रक्रिया आहे. या टप्प्यावर वैमानिकावर सर्वाधिक मानसिक ताण असतो. त्यांनी योग्यवेळी गती कमी न केल्यास विमानाचा अपघात होण्याची भीती असते.
- लँडिंगवेळी विमान किती वेगात आणि कोणत्या अँगलने धावपट्टीवर उतरवायचं अशा विविध गोष्टींचा निर्णय पायलटला घ्यावा लागतो, वेळीच निर्णय न घेतल्यास अपघात होण्याची संभावना असते.
- लँडिंगवेळी विमानाचा गियर नीट न उघडणं किंवा ब्रेक यंत्रणेत बिघाड झाल्यास, विमान धावपट्टीवरून घसरून मोठा अपघात होऊ शकतो.

एअर इंडियाच्या विमानांचे आजवर किती अपघात झाले?
आजपर्यंत एअर इंडियाच्या विमानाचे सात मोठे अपघात झालेले आहेत, ज्यामध्ये जवळपास एक हजारहून अधिक प्रवाशांनी आपले प्राण गमावले आहेत. २०२० मध्ये करोना संकटाच्या काळात एअर इंडियाने विशेष ‘वंदे भारत मिशन’ अंतर्गत उड्डाण चालवलं होतं. या मिशनअंतर्गत परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणलं जात होतं. ७ ऑगस्ट २०२० रोजी एअर इंडियाच्या विमानाने दुबईहून उड्डाण घेतले आणि संध्याकाळी कोझिकोड विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र, जोरदार पावसामुळे रनवे ओला झालेला होता. पहिल्या प्रयत्नात विमान लँड होऊ शकलं नाही. दुसऱ्या प्रयत्नात ते उतरलं; पण रनवेवरून घरून खोल दरीत जाऊन कोसळलं. या अपघातात २१ प्रवाशांचा मृत्यू झाला होता, तर १०० हून अधिक प्रवासी जखमी झाले होते.
हेही वाचा : Air India Plane Crash: विमान अपघात झाल्यास किती नुकसान भरपाई मिळते? विमान कंपनी की सरकार? कोण देतं भरपाई?
एअर इंडियाच्या विमानाला २०२० मध्ये अपघात
२२ मे २०१० मध्ये एअर इंडिया एक्स्प्रेस फ्लाईट ८१२ चा लँडिंगदरम्यान अपघात झाला होता. हे विमान मंगळुरूजवळील तन्निरभावी येथे कोसळले होते. या विमानातून एकून १६६ प्रवासी प्रवास करीत होते आणि त्यातील १५८ प्रवाशांचा जणांचा मृत्यू झाला होता. २३ जून १९८५ मध्ये मॉन्ट्रियलहून नवी दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या बोईंग ७४७-२३७बी या विमानाचा आयर्लंडच्या किनाऱ्यावर स्फोट झाला होता. या अपघातात विमानातील सर्व ३२९ प्रवाशांचा मृत्यू झाला. त्यात बहुतांश भारतीय वंशाचे कॅनेडियन होते. १९८४ मध्ये पंजाबमधील सुवर्ण मंदिरावर झालेल्या भारतीय सैन्याच्या प्राणघातक हल्ल्याचा बदला घेण्यासाठी शीख फुटीरतावाद्यांनी हा बॉम्बस्फोट घडवून आणला होता.
एअर इंडियाचं विमान कोसळलं होतं समुद्रात
१ जानेवारी १९७८ रोजी एअर इंडियाचे विमान ८५५ मुंबई किनाऱ्यावरून खाली येत अरबी समुद्रात कोसळले होते. दुबईला जाणाऱ्या या विमानाने रात्री आठ वाजेच्या सुमारास मुंबईतील सांताक्रूझ विमानतळावरून उड्डाण घेतलं. मात्र, काही अंतरावर असलेल्या अरबी समुद्रात जाऊन ते कोसळलं. या अपघातात विमानातील सर्व २१३ जणांचा तात्काळ मृत्यू झाला होता. याशिवाय १९६६ साली स्वित्झर्लंडममध्ये आणि १९५० मध्ये फ्रेंच-इटालियन सीमेवरही विमानाचा अपघात झाला होता आणि त्यात शेकडो प्रवासी मृत्युमुखी पडले होते.