पँगाँग सरोवर हे लडाखमध्ये समुद्र सपाटीपासून १३ हजार ८०० फुट उंचीवर ( ४२२० मीटर), भारत-चीन सीमेवर पूर्व -पश्चिम पसरलं आहे. याची लांबी साधारण १३४ किलोमीटर असून हे सरोवर काही ठिकाणी ५ किलोमीटर एवढे अरुंद आहे, सुमारे ७०० चौरस किलोमीटर भागात याचा पसारा आहे. या सरोवराचा साधारण ४० टक्के भाग भारतात तर उर्वरित ६० टक्के भाग हा चीनमध्ये येतो.

लडाखमधील पँगाँग सरोवराच्या भागात मे २०२० मध्ये ज्या ठिकाणापासून संघर्ष सुरु झाला त्यापासून काही किलोमीटर अंतरावर चीन दुसरा पूल बांधत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. दुसरा पूल जो बांधला जात आहे तात्पुरता नसून तो कायमस्वरुपी बांधला जात आहे, भक्कम बांधकाम यासाठी केले जात आहे. पहिला जो पूल बांधण्यात आला तो नव्या दुसऱ्या पूलाच्या बांधकामासाठी आवश्यक साहित्य वाहून नेण्यासाठी बांधण्यात आल्याचं आता स्पष्ट होत आहे.

दुसरा पूल नेमका कोठे आहे ?

पँगाँग सरोवराच्या उत्तरेला ज्या ठिकाणी भारत आणि चीनचे सैन्य आमनेसामने आले होते त्या फिंगर ८ या भागापासून पूर्वेला सुमारे २० किलोमीटर भौगोलिक अंतरावर पहिला पूल बांधण्यात आला होता. प्रत्यक्षात रस्तामार्गे हे अंतर ३५ किलोमीटरपेक्षा जास्त आहे. हा पहिला पूल ४०० मीटर लांब आणि ८ मीटर रुंद एवढा होता. आता या पूलाच्या पूर्वेला काही अंतरावर Khurnak भागात दुसरा नवा भरभक्कम पूल बांधला जात आहे.

नवा पूल चीनसाठी का महत्त्वाचा ?

सैन्याची हालचाल लवकर होण्यासाठी हा नवा पूल चीनसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. ज्या ठिकाणी पँगाँग सरोवर हे सर्वात अरुंद आहे त्या ठिकाणी या नव्या पूलाचे बांधकाम सुरु आहे. यामुळे पँगाँग सरोवरच्या उत्तर भाग जिथे फिंगर पॉईंट, गलवान परिसर आणि अर्थात विस्तृत प्रत्यक्ष ताबारेषा आहे त्या ठिकाणी सैन्य, अवजड वाहने, रणगाडे वगैरे वेगाने नेणे सोईस्कर ठरणार आहे. याआधी याच परिसरात पोहचण्यासाठी संपूर्ण सरोवराला वळसा घालत, १०० किलोमीटर पेक्षा जास्त अंतर पार करत चीनच्या सैन्याला जावे लागायचे. आता हे अवघ्या काही तासांत शक्य होणार आहे. तलावाच्या दोन्ही उत्तर आणि दक्षिण बाजूंना सोईनुसार सैन्य हालचाल वेगाने करणे या नव्या पूलामुळे शक्य होणार आहे. कारण या भागातील अनेक ठिकाणे ही आजही वादग्रस्त आहेत, भारत-चीन दोघेही दावा सांगत आले आहेत. तेव्हा गलवानपेक्षा आणखी संघर्षमय परिस्थिती उद्भवली तर या पूलामुळे सैन्य हालचाल चीनसाठी जमेची बाजू ठरणार आहे. तसंच या सर्व भागात चीनने अधिक सैन्य दिर्घकाळाकरता तैनात केलं असून गावंही वसवण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. विशेषतः या भागातील प्रतिकुल हवामान आणि भौगोलिक स्थिती लक्षात घेता नवा पूल चीनसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

भारत काय पावले उचलत आहे ?

चीनची नव्या पूलाची उभारणी ही वादग्रस्त भागात सुरु असल्याचं भारताने स्पष्ट केलं आहे. ” पहिला पूल काय किंवा आता बांधला जात असलेला नवीन दूसरा पूल काय हे दोन्ही पूल चीनने १९६२ ला बळकावलेल्या भागात बांधले जात आहेत. असा अवैध ताबा आम्ही याआधीपासून अमान्य करत आलेलो आहोत, अवैध ठरवत आलेलो आहोत आणि आता त्या ठिकाणी सुरु असलेले बांधकाम हे बेकायदेशीर आहे ” अशी प्रतिक्रिया परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिली आहे.

अशा बांधकामांबद्द्ल माजी लष्करप्रमुखजनरल नरवणे यांनी जानेवारीमध्ये एक प्रतिक्रिया दिली होती. “गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत आपण आता चांगली तयारी केली आहे. या भागात जे चीन करत आहे त्यांच्या तोडीस तोड आपण तयारी केली आहे. पायाभूत सुविधांच्या बाबातीत चीनच्या समोर आपण कुठेही कमतता ठेवलेली नाही” असे लष्करप्रमुखांनी स्पष्ट केले होते.

२०२१ मध्ये रस्ते सीमा संघटनेने (Border Roads Organization) सीमेवर विविध ठिकाणी १०० प्रकल्प पूर्ण केले, यापैकी बहुतांश हे चीनच्या सीमेवरील आहेत. आपण ताबा रेषेच्या जवळ गस्त घालण्याच्या क्षमतेत वाढ केली आहे, तसंच नव्या धावपट्ट्या विकसित केल्या आहे, केल्या जात आहेत.

सध्या लडाखमधील ताबा रेषेच्या ठिकाणी काय परिस्थिती आहे ?

या भागातील अनेक वादग्रस्त भागांबाबत विविध चर्चेच्या फेऱ्यांनंतर तोडगा निघाला असला तरी अजुनही तीन भागांबाबत अजुनही तोडगा निघू शकलेला नाही. पुढची चर्चेची तारीख अजुन निश्चित झालेली नाही. Depsang Plain भागात चीनकडून भारतीय सैन्याची अडवणूक केली जात असून यामुळे PP10, PP11, PP11a, PP12 आणि PP13 या ठिाकाणी गस्त घालण्यात भारतीय सैन्याला अडचणी येत आहेत.

लडाख भागात विशेषतः गेल्या काही महिन्यात संघर्ष उडालेल्या गलवान, Pangong Tso भागात चीनप्रमाणे भारतानेही ५० हजार पेक्षा सैन्य तैनात केले आहे. याचबरोबर लढाऊ हेलिकॉप्टर, तोफा, हवाई घुसखोरी रोखणारी रडार, क्षेपणास्त्रे या भागात तैनात आहेत. तसंच सर्व प्रकारच्या वातावरणात १२ महिने रसद पुरवठा होईल, ताबा रेषेवर सुविधा मिळतील अशी तयारी लष्कराने केली आहे. ताबा रेषेजवळ आणखी मोठ्या प्रमाणात सैन्याच्या हालचालीची गरज पडल्यास तशी मालवाहू विमानांची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.