दक्षिण काश्मीरमधील पहलगाममध्ये २३ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशासह जगातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात अनेक मोठे निर्णय घेतले, तसेच भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर मोठी कारवाई केली आणि हे तळ उद्ध्वस्त केले.

या हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून भारताच्या सीमेवर होणाऱ्या ड्रोन हल्ल्यालादेखील भारताने चोख प्रत्युत्तर दिले. परंतु, केवळ भारतीय सशस्त्र दलांच्या गोळीबाराने पाकिस्तानी सैन्याला रोखले नाही, तर भारतीय हवाई दलाने शत्रूच्या विमानांना भारतीय हवाई क्षेत्रात प्रवेश करण्यापासून रोखत अनेक पाकिस्तानी विमाने पाडली. मात्र, भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान युक्तीचा वापर करत शत्रूचे हवाई सुरक्षा कवच भेदल्याची माहिती आहे. नक्की काय घडले जाणून घेऊयात.

ऑपरेशन सिंदूर

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर त्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर नावाने मोहीम राबवली होती. या मोहिमेत पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राइक करण्यात आला. या हल्ल्यात किमान १०० दहशतवादी ठार झाल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली होती. यापूर्वी भारतात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी दहशतवाद्यांना लक्ष्य करत हे ऑपरेशन चालवण्यात आले.

ऑपरेशन सिंदूरदरम्यान डमी विमानाचा वापर कशासाठी?

उच्चपदस्थ संरक्षण सूत्रांच्या माहितीच्या आधारावर ‘एएनआय’ने वृत्त दिले आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय हवाई दलाने (आयएएफ) पाकिस्तानमधील चीनने पुरवलेल्या हवाई संरक्षण प्रणालींना भेदण्यासाठी आणि निष्क्रिय करण्यासाठी लढाऊ विमानांसारख्या दिसणाऱ्या डमी म्हणजेच बनावट विमानांचा वापर केला. ९ ते १० मे च्या रात्री, भारताने १२ पैकी ११ प्रमुख पाकिस्तानी हवाई तळांवर हल्ला केला. परंतु, क्षेपणास्त्र हल्ल्यांची सुरुवात करण्यापूर्वी, भारतीय हवाई दलाने सर्वात आधी खऱ्या लढाऊ विमानांऐवजी त्याचसारख्या दिसणाऱ्या मानवरहित बनवटी विमानांना पाठवले.

पाकिस्तानच्या हवाई हद्दीत शिरलेल्या या बनावट भारतीय विमानांना पाकिस्तानने खरे लढाऊ विमान समजून त्यांची रडार आणि क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली सक्रिय केली. भारताला याचीच प्रतीक्षा होती. परिणामी त्यांच्या HQ-9 क्षेपणास्त्र प्रणाली सक्रिय झाल्यावर त्यांची ठिकाणे उघड झाली आणि भारताला हल्ला करण्याची संधी मिळाली. पाकिस्तानी हवाई दलाने त्यांचे संपूर्ण HQ-9 हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली लाँचर्स आणि रडार वेगवेगळ्या ठिकाणी तैनात केले आणि त्यापैकी काही नवीन ठिकाणी तैनात करण्यात आले, परंतु ही प्रणाली सक्रिय झाल्यानंतर त्यांचे ठिकाण उघड झाले, असे वृत्त ‘एएनआय’ने दिले.

भारतीय हवाई दलाने पाकिस्तानी हवाई तळांवर लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे वापरली. त्यामध्ये ब्राह्मोस आणि स्कॅल्प क्षेपणास्त्रांचा समावेश होता. हल्ल्यात सुमारे १५ ब्राह्मोस क्षेपणास्त्रे, तसेच स्कॅल्प, रॅम्पेज आणि क्रिस्टल मेझ क्षेपणास्त्रे डागण्यात आली. या हल्ल्यांमुळे पाकिस्तानच्या हवाई दलाचे नेटवर्क कमकुवत झाले. हवाई पट्ट्या, हँगर आणि दळणवळण पायाभूत सुविधा बंद पडल्या. संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संघर्षात ब्राह्मोस क्षेपणास्त्र प्रणालीचा पहिल्यांदाच वापर करण्यात आला.

सूत्रांनी ‘एएनआय’ला माहिती दिली की, त्यांच्या हवाई तळांवर केलेले हल्ले इतके तीव्र होते की, पाकिस्तानी बाजूने भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीला प्रत्युत्तर देण्याचे सर्व प्रयत्न मागे पडले. अखेर पुढील सर्व लष्करी कारवाई थांबवण्यासाठी भारताबरोबर शस्त्रविराम करार करण्यासाठी त्यांनी डीजीएमओ चर्चेला तातडीने विनंती केली.

ऑपरेशन सिंदूरने काय साध्य केले?

भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून काय साध्य केले, या संदर्भातील सविस्तर माहिती ११ मे रोजी भारतीय डीजीएमओच्या (डीजीएमओ) तीनही सैन्य दलाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत दिली. “ऑपरेशन सिंदूरने दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केले, त्यामुळे ऑपरेशन सिंदूरचे उद्दिष्ट साध्य झाले. तसेच ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे झालेला परिणाम जगासमोर स्पष्ट आहे. दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्याचे आमचे उद्दिष्ट साध्य झाले का? असे आपण विचारल्यास याचे उत्तर हो असे आहे, तसेच त्याचे परिणाम जगासमोर आहेत”, असे एअर मार्शल ए. के. भारती यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, “भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या पार पाडले. सर्व निवडक उद्दिष्टे साध्य केली. सर्व भारतीय वैमानिक सुरक्षितपणे परतले. भारतीय हवाई दलाने शत्रूच्या विमानांना भारतीय हवाई क्षेत्रात प्रवेश करण्यापासून रोखत अनेक पाकिस्तानी विमाने पाडली. त्यांच्या विमानांना आमच्या सीमेत प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले,” असेही ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके)मधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ला केल्यानंतर तुर्किये आणि अझरबैजानने पाकिस्तानला खुला पाठिंबा जाहीर केला. परंतु, भारतीयांनी त्यांच्या पाकिस्तान समर्थक भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि आता या देशांच्या पर्यटनावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन मोठ्या प्रमाणात केले जात आहे. तुर्कियेच्या परराष्ट्र मंत्रालयाने हल्ल्यासाठी भारताचा निषेध केला. त्यांनी म्हटले की, ऑपरेशन सिंदूरमुळे संपूर्ण युद्धाचा धोका निर्माण झाला आहे. भारतीय लष्कराने हेदेखील उघड केले की, ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने भारताच्या सीमावर्ती भागात पाठवलेले ३०० ते ४०० ड्रोन हे तुर्कियेमध्ये तयार करण्यात आलेले सोंगर ड्रोन होते. अझरबैजाननेदेखील भारताच्या लष्करी कारवाईचा निषेध केला. अझरबैजानच्या परराष्ट्र मंत्रालयानेही पाकिस्तानला पाठिंबा देणारे निवेदन जारी केले.