– मंगल हनवते

देशाची राजधानी आणि आर्थिक राजधानी यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (एनएचआय) मुंबई ते दिल्ली द्रुतगती महामार्ग उभारला जात आहे. या महामार्गाचा एक भाग म्हणजे मुंबई-बडोदा द्रुतगती महामार्ग. या महामार्गाचे काम वेगाने सुरू असून यात ट्विन ट्यूब टनेल अर्थात दुहेरी बोगदे बांधण्यात येत आहेत. हे बोगदे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील अशा माथेरान डोंगराच्या खालून जाणार आहेत. हे काम अत्यंत अवघड आणि आव्हानात्मक असेल. या बोगद्याच्या कामातील भुयारीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे. त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर दुहेरी बोगदे कसे आहेत, हे बोगदे कसे बांधले जाणार आहेत, त्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरले जाणार, याचा हा आढावा…

traffic block, Mumbai-Pune Expressway,
मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर उद्या दोन तासांचा वाहतूक ब्लॉक
mumbai pune expressway marathi news
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहनांचा वेग वाढणार, बोरघाटात आता ताशी ६० किमी वेगाने वाहने धावणार
Recovery of installments on Shiv-Panvel highway bus drivers associations statement to Deputy Commissioner of Police
शीव-पनवेल महामार्गावर ‘हप्ते वसुली’, बस चालक संघटनेचे पोलीस उपायुक्तांना निवेदन
Railway megablock
रेल्वेचा पुन्हा मेगाब्लॉक! जाणून घ्या कोणत्या गाड्या रद्द अन् कोणत्या उशिरा धावणार…

मुंबई-दिल्ली द्रुतगती महामार्गाचा पहिला टप्पा कुठे आहे?

देशातील दळणवळण सेवा बळकट करण्यासाठी एनएचआय (राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण) कडून देशभर रस्त्यांचे, द्रुतगती महामार्गाचे जाळे विणले जात आहे. महत्त्वाची शहरे एकमेकांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुंबई-दिल्ली महामार्ग हा यातील महत्त्वाचा टप्पा आहे. १३८६ किमी लांबीच्या या महामार्गाचे काम वेगात सुरू आहे. यातील पहिला टप्पा, दिल्ली ते जयपूरचे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नुकतेच झाले. याच द्रुतगती महामार्गाचा मुंबईच्या बाजूचा टप्पा म्हणजे मुंबई ते बडोदा महामार्ग. या टप्प्याचे काम महाराष्ट्रात सध्या वेगात सुरू आहे.

मुंबई ते बडोदा अंतर केवळ चार तासात?

मुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गाचे काम दोन टप्प्यांत करण्यात येत आहे. महामार्ग सुमारे ४४० किमी लांबीचा आहे. हा महामार्ग पूर्ण झाल्यास मुंबई ते वडोदरा हे अंतर केवळ चार तासांत पार करता येईल. आजच्या घडीला हे अंतर पार करण्यासाठी साडेसात तास लागतात. बडोदा ते तलासरी आणि तलासरी ते मोरबे अशा दोन टप्प्यांत महामार्गाचे काम सुरू आहे. पहिला बडोदा-तलासरी टप्पा २७५.३२ किमी लांबीचा आहे. या टप्प्याचे काम दहा ठिकाणी सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यात तलासरी ते मोरबेदरम्यानचे काम केले जात आहे. या टप्प्यात अ, ब आणि क असे आणखी टप्पे आहेत. त्यानुसार २ अ अंतर्गत तलासरी ते विरार अशा ७६.८१ किमी लांबीच्या महामार्गाचे काम सुरू आहे. टप्पा २ बमध्ये विरार ते मोरबे असे ७९.७८३ किमी लांबीचे काम सुरू आहे. टप्पा २ क हा भोज ते मोरबे दुहेरी बोगद्याच्या कामाचा आहे. हा सर्वात महत्त्वाचा आणि आव्हानात्मक असा टप्पा असेल.

माथेरानच्या डोंगराखालून जाणारे बोगदे कसे आहेत?

मुंबई ते बडोदा द्रुतगती महामार्गाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात ट्विन ट्यूब टनेल (दुहेरी बोगदे) बांधण्यात येणार आहेत. अंबरनाथमधील भोज गाव ते पनवेलमधील मोरबे असा हा बोगदा असेल. ४.१६ किमी लांबीचा, २१.४५ मीटर रुंदीचा आणि ५.५ मीटर उंचीचा असा हा दुहेरी बोगदा आहे. या बोगद्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हा दुहेरी बोगदा पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील अशा माथेरानच्या डोंगराखालून जाणार आहे. भल्या मोठ्या डोंगराखाली भुयारीकरण करणे हे मोठे आव्हान एनएचआयसमोर असेल.

हेही वाचा : विश्लेषण : संभाव्य लिथियम मिळवण्याचा मार्ग खडतर?

माथेरान डोंगराखाली बोगदा कसा करणार?

बोगद्याचे काम करणे हे अत्यंत अवघड आणि आव्हानात्मक काम असते. मात्र तंत्रज्ञानाच्या आधारे हे आव्हान पेलणे यंत्रणांना सोपे होऊ लागले आहे. या दुहेरी बोगद्याच्या कामासाठी एनएचआयने नवीन आणि अत्याधुनिक अशा ऑस्ट्रियन एनएटीएम तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. बोगद्याचे काम सुरू झाले आहे. प्रत्यक्ष भुयारीकरणाच्या कामालाही लवकरच सुरुवात होणार आहे. त्यासाठी दोन एनएटीएम मशीन दाखल झाल्या आहेत. लवकरच आणखी दोन यंत्रे येणार आहेत. एकूणच चार यंत्रे भुयारीकरणाचे काम पूर्ण करणार आहेत.

बोगदा आणि महामार्ग कधी पूर्ण होणार?

येत्या चार-पाच दिवसांत भुयारीकरणाच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. काम येत्या दोन वर्षांत पूर्ण करून बोगदा जून २०२५पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. दरम्यान बडोदा ते तलासरी टप्पा डिसेंबर २०२४ मध्ये पूर्ण होण्याचा अंदाज आहे. तलासरी ते विरार टप्पा जून २०२४ मध्ये पूर्ण करण्याचे नियोजन आहे. मात्र महामार्ग पूर्ण होण्यास जून २०२५पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. जून २०२५मध्ये महामार्ग सेवेत दाखल झाल्यास मुंबई ते बडोदा अंतर केवळ चार तासांत पार करता येणार येईल.

हेही वाचा : लोकांकडून मतदान होत नाही तेव्हा राग येतो का? राज ठाकरे म्हणाले, “एवढ्या सगळ्या गोष्टी करूनही…”

बोगद्यामुळे मुंबई आणि उपनगरांना कोणता फायदा?

माथेरान बोगद्यामुळे डोंगराला मारण्याचा मोठा वळसा वाचणार आहे. हा बोगदा केवळ तीन मिनिटांत पार करता येणार आहे. त्यामुळे वसई, ठाणे, कल्याण आणि नवी मुंबईतील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होईल. हा महामार्ग मुंबई महानगर प्रदेशाच्या (एमएमआर) दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा आहे. पुढे हा महामार्ग विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गाशीही जोडला जाणार आहे.