History of Kamakhya devi: भारतीय संस्कृतीत निसर्गप्रधान सण-उत्सवांना प्राधान्य दिले जाते. निसर्ग आणि सजीव जीवन यांचा अनोखा संगम भारतीय सांस्कृतिक परंपरेत दिसून येतो. सध्या वर्षा ऋतूचे आगमन झाले आहे. उन्हाच्या झळा सोसलेल्या धरणीला नवचैतन्य मिळाले आहे. या कालखंडात आपले भरणं पोषण करणाऱ्या भूमीला कृषिराज आराम देतो. म्हणजेच या कालखंडात शेतीची कामं होत नाहीत. भविष्यातील सृजनता अनुभवण्यासाठी हा आरामाचा कालखंड गरजेचा असतो. भारतीय संस्कृतीत स्त्री आणि भूमी यांच्यात साम्य योजले जाते.

“नाना रुपरंगानी आणि रस गंधांनी रसरसलेल्या वनस्पतींचा गर्भ वाहणारी पृथ्वी आणि नाना विचार विकारांनी अन संकल्प विकल्पांनी भारलेल्या मानवमात्राचा गर्भ वाहणारी स्त्री यांच्यात आदिमकाळापासून समधर्मितत्व आणि एकरूपत्त्व कल्पिलेले दिसते” असे रा.चिं. ढेरे यांनी त्यांच्या लज्जागौरी या पुस्तकात म्हटले आहे.

म्हणूनच हे पर्व किंवा हा कालखंड भारताच्या वेगवेगळ्या भागात उत्सवाच्या स्वरूपात साजरा केला जातो. स्त्रीची सर्जनशीलता सोहळ्याच्या रूपात साजरी करण्याची भारतीय संस्कृतीची परंपरा ही जगातील मोजक्या संस्कृतींमधील एक आहे. असाच एक सोहळा आसामच्या कामाख्या देवीच्या मंदिरात दरवर्षी साजरा केला जातो. खरंतर देवी या कालखंडात रजस्वला होते. देश विदेशातून तिचे पुरुष भक्तही आवर्जून या सोहळ्यात उपस्थित राहतात. म्हणूनच हा सोहळा का महत्त्वाचा आहे? याचाच घेतलेला हा आढावा.

अंबुवाची पर्व; पाळीविषयी निषिद्धतेच्या संकल्पनांना चोख उत्तर (Why is Ambubachi Festival Important?)

कामाख्या देवीचा हा सोहळा अंबुवाची पर्व म्हणून ओळखला जातो. दरवर्षी जून-जुलै महिन्याच्या सुमारास जगाच्या कानाकोपऱ्यातील भक्तगण आवर्जून या पर्वाला उपस्थित राहतात. भाविकांमध्ये तपस्वी आणि तांत्रिकांचा समावेश मोठ्या प्रमाणात असतो. कामाख्या देवीचा अंबुवाची पर्व हा केवळ धार्मिक सोहळा नाही तर स्त्रीच्या मासिक पाळीविषयी असलेल्या निषिद्धतेच्या संकल्पनांना चोख उत्तर आहे.

अंबुवाची पर्वात देवी रजस्वला होते

कामाख्या हे शक्तिपीठांपैकी सर्वात महत्त्वाचे शक्तीपीठ आहे. सतीच्या आत्मदहनानंतर तिच्या योनीचा भाग येथे गळून पडला होता. म्हणूनच हे शक्तीपीठ योनिपीठ किंवा जोनीपीठ म्हणून ओळखले जाते. अंबुवाची पर्वात कामाख्या देवी रजस्वला होते आणि काही काळासाठी एकांतात विश्रांतीसाठी जाते.

या कालखंडात कामाख्या देवीचे गर्भगृह तीन दिवसांसाठी बंद ठेवले जाते. तर गर्भगृहातील शिलेत कोरलेल्या योनी सदृश्य प्रतिकावर पांढरे वस्त्र अंथरले जाते. चौथ्या दिवशी मंदिराच्या गर्भगृहाचे दार मोठ्या उत्साहात भाविकांसाठी उघडले जाते. यादिवशी प्रसादात भाविकांना देवीच्या रक्त वस्त्राचा तुकडा दिला जातो.

रा.चिं. ढेरे यांनी म्हटले आहे की, ‘अंबुवाची’ हा पृथ्वीच्या रजस्वलावस्थेशी संबंधी असा एक व्रतोत्सव आहे. अंबुवाची म्हणजे रजोदर्शन. संस्कृतमध्ये अंबु म्हणजे पाणी आणि बाची/वाची म्हणजे बहरण्याची क्रिया. या संज्ञेतील अंबु हे पूर्वपद जलवाचक आहे. जल हे सर्जनप्रक्रियेत स्त्रीतत्त्वाचे प्रतीक मानले जाते. हे ‘अग्निसोमात्मकं जगत’ सोमाच्या म्हणजे जलाच्या गर्भातून प्रसवलेले आहे. या सर्जनक्षम जलालाच येथे ‘अंबु’ म्हणून निर्दिष्ट केले आहे. यातूनच जलाची सर्जनक्षमता प्रकट होते, ती अवस्था- रजस्वलावस्था ‘अंबुवाची’ या संज्ञेने व्यक्त केली आहे. ऋग्वेदातील सूक्तातही विश्वमातृत्त्वाच्या या अवस्थेचे वर्णन केले आहे.

माता पितरमृत आ बभाज धीत्यग्रे मनसा सं हि जग्मे। सा बीभत्सुगर्भरसा निविध्दा नमस्वन्त इदुपवाकमीयु: ।।

रक्त वस्त्र पवित्र का मानले जाते?

मृगशीर्ष नक्षत्रात चतुर्थ चरण आणि आद्रा नक्षत्राच्या प्रथम चरणात तुफान वृष्टीच्या काळात कामाख्या रजस्वला आहे, असे मानले जाते. आषाढ शुक्ल ६ अथवा ७ पासून १० अथवा ११ पर्यंत अंबुवाचीचा काळ येतो. तीन दिवसांनी ग्रभागृहाचे दार उघडल्यावर योनी शिलेवर गुंडाळलेले वस्त्र लाल रंगाचे झालेले असते. हे वस्त्र देवीचे रजोरंजित वस्त्र असल्याचे मानले जाते.

या वस्त्राचे तुकडे प्रसाद म्हणून वाटले जातात. ज्यांना या कापडाचा तुकडा मिळतो ते पाकिटामध्ये, देव्हाऱ्यात ठेवतात किंवा शरीरावर ताविजाच्या स्वरूपात धारण करतात. कुब्जीकातंत्रात या वस्त्राचा महिमा वर्णिलेला आहे. अपत्य प्राप्तीची इच्छा ठेवणारे भाविक अंबुवाची पर्वात मोठ्या प्रमाणात सामील होतात. या कालखंडात केवळ ते सफेद वस्त्रच नाही तर संपूर्ण नीलचल पर्वत रक्तच्छटा परिधान करतो. लाल वस्त्र हे केवळ धार्मिक विधीचा भाग नाही. ते स्त्रीत्व, निर्मिती आणि जीवनाच्या चक्राचे प्रतीक आहे. समाजात मासिक पाळीला अनेकदा अशुद्ध मानले जाते, परंतु कामाख्या ही या सर्व भेदाभेदाच्या सीमा पार करते. येथे, रक्तस्त्रावाची क्रिया पवित्र आहे आणि स्त्री शरीराला जीवनाचे मूळ म्हणून आदर दिला जातो.

तांत्रिक परंपरा आणि गूढ पद्धती

कामाख्या ही तांत्रिक उपासनेचा एक गड आहे आणि या गूढ परंपरांमध्ये अंबुवाचीचे विशेष स्थान आहे. या तीन दिवसांत तांत्रिक साधक सखोल आध्यात्मिक ज्ञान आणि गूढ ज्ञान मिळवण्याच्या उद्देशाने समारंभात सहभागी होतात. वामाचारी तांत्रिकांना रजस्वलेच्या योनीची पूजा सर्वाधिक महत्त्वाची वाटते. ‘भगमालिनीरजस्वलास्तोत्रा’त रजोयुक्त योनीच्या पूजेचा महिमा वर्णिला आहे.

गैरसमज आणि विज्ञान

इतर कोणत्याही प्रतीकात्मक विधीसारखेच, रक्त वस्त्र या विधीभोवतीही काही गैरसमज आहेत. लाल वस्त्र प्रत्यक्षात मासिक पाळीतील रक्ताने लाल होते असा काही भक्तांचा समज आहे. मात्र, मंदिर प्रशासन हा दावा सातत्याने फेटाळत आले आहे. लाल रंग केवळ प्रतीकात्मक आहे, असं तज्ज्ञ सांगतात. ब्रह्मपुत्रा नदी देखील अंबुबाची मेळ्यादरम्यान लालसर होते. भक्त त्याकडे दैवी चमत्कार म्हणून पाहतात. परंतु, लोह ऑक्साईडचे प्रमाण, मातीचे अपसरण किंवा सिन्नाबार खनिजाचे अस्तित्व यामुळे हे घडत असल्याचे अभ्यासक सांगतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रक्त वस्त्र, म्हणजेच केवळ लाल कापड नाही. तर, सृष्टीची सुरुवात स्त्रीत्वापासून होते याचे ते साक्षीदार आहे. मासिक पाळी ही लाज वाटण्याची गोष्ट नसून ती एक पवित्र शक्तीचं प्रतीक आहे. सर्जनतेचं प्रतीक आहे. कामाख्या देवीचं तीर्थ हे प्राचीन कथा आणि परंपरांनी समृद्ध आहे. या कथा, परंपरा निसर्ग, मानवी शरीर आणि जीवन चक्रांमध्ये वसलेल्या दैवी शक्तीचा सन्मान करण्याचा मोलाचा सल्ला देतात.