पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू करत पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या मोहिमेनंतर जगभरातील देशांमध्ये भारताकडून सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवण्यात आले आणि दहशतवादाविरुद्ध केलेल्या कारवाईची माहिती जागतिक समुदायाला दिली आणि त्यांचा पाठिंबा मिळवला. मात्र, आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांना आमंत्रित केले आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणावादरम्यान ट्रम्प वेगळेच राजकारण करत असल्याचे दिसून येत आहे.

पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर शनिवारी (१४ जून) वॉशिंग्टन डीसी येथे अमेरिकन सैन्याच्या २५० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित समारंभात सहभागी होणार आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ७९ व्या वाढदिवसानिमित्त अमेरिकन सैन्याकडून परेडचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, या परेडकरिता असीम मुनीर यांना आमंत्रित करण्यामागील अमेरिकेचा हेतू काय? अमेरिकेची रणनीती काय? त्याविषयी जाणून घेऊयात.

पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांना शाहबाझ शरीफ सरकारने २० मे रोजी फील्ड मार्शल म्हणून बढती दिली आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

पाकिस्तानचेच्या लष्करप्रमुखांचा अमेरिका दौरा

  • पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांना शाहबाझ शरीफ सरकारने २० मे रोजी फील्ड मार्शल म्हणून बढती दिली आहे.
  • ब्रिटीश परंपरेतील लष्करी व्यवस्थेत फील्ड मार्शल हे सर्वोच्च पद मानले जाते.
  • वरिष्ठ गुप्तचर सूत्रांनी ‘सीएनएन-न्यूज१८’ला सांगितले की, असीम मुनीर शनिवारी अमेरिकन सैन्याच्या समारंभात वॉशिंग्टन डीसीमधील इतर लष्करी नेत्यांबरोबर सामील होतील.
  • ते गुरुवारी (१२ जून) अमेरिकेत दाखल होण्याची शक्यता आहे, अशी माहिती वॉशिंग्टन डीसीमधील पाकिस्तानी दूतावासातील सूत्रांनी दिली आहे.
  • भारत-पाकिस्तान तणावादरम्यानचा असीम मुनीर यांचा हा पहिलाच दौरा आहे. त्यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख म्हणून २०२३ मध्ये अमेरिकेला भेट दिली होती.
  • त्यावेळी त्यांनी तत्कालीन अमेरिकन संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन, उप-परराष्ट्र सचिव स्टीफन बिगन आणि संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांची भेट घेतली होती.

त्यावेळी झालेल्या भेटीवर प्रतिक्रिया देत भारताने म्हटले होते, “पाकिस्तानच्या दहशतवादाला पाठिंबा, सीमापार हल्ल्यांना पाठिंबा याबद्दलच्या चिंता सर्वांना माहीत आहे. आम्हाला आशा आहे की, इतर देशही दहशतवादविरोधी कारवाईला गांभीर्याने घेतील.” पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (आयएसपीआर) च्या निवेदनानुसार, एप्रिलमध्ये अमेरिकेच्या एका शिष्टमंडळाने रावळपिंडीमध्ये मुनीर यांची भेट घेतली होती आणि प्रादेशिक सुरक्षा व संरक्षण क्षेत्रातील विषयावर चर्चा केली होती.

अमेरिकेला भेट देण्याचे कारण काय?

भारत-पाकिस्तान तणाव सर्वज्ञात आहे. लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या अमेरिकेच्या दौऱ्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या दौऱ्यात चीन आणि पाकिस्तानच्या मैत्रीविषयी चर्चा होण्याची शक्यता आहे. ‘सीएनएन-न्यूज १८’च्या वृत्तानुसार, बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (बीआरआय) आणि चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (सीपीईसी) सारख्या योजनांद्वारे चीनशी जवळीक साधल्यामुळे अमेरिकेला पाकिस्तानच्या तटस्थतेबद्दल शंका आहे. सध्याचे भू-राजकीय वातावरण पाहता अमेरिका पाकिस्तानला तटस्थ मध्यस्थ म्हणून पाहणार नाही, असे सूत्रांनी सांगितले आहे. त्याचे कारण म्हणजे जगात, विशेषतः आशियामध्ये चीनच्या वाढत्या प्रभावाला अमेरिकेचा विरोध आहे.

प्राप्त माहितीनुसार, या भेटीदरम्यान ट्रम्प प्रशासन पाकिस्तानला अफगाणिस्तान आणि भारताला लक्ष्य करणाऱ्या दहशतवादी गटांविरुद्ध कारवाई करण्यासाठी दबाव आणण्याची शक्यता आहे; तर पाकिस्तानदेखील अमेरिकेला तहरीक-ए-तालिबान (टीटीपी) विरोधात भूमिका घेण्याची मागणी करू शकते. पाकिस्तानवर हल्ले करण्यासाठी अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर केल्याचा आरोप आहे, मात्र हा आरोप काबुलने फेटाळून लावला आहे. पाकिस्तान लिथियम, तांबे, सोने आणि दुर्मीळ पृथ्वी खनिजांनी समृद्ध आहे, त्यामुळे अनेक देश गुंतवणुकीसाठी उत्सुक आहेत, त्यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

मुनीर यांचा दौरा अमेरिका आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण सुरक्षा संबंध सुधारण्यासाठीदेखील महत्त्वपूर्ण असल्याचे मानले जात आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख काश्मीरच्या मुद्द्याबाबतदेखील अमेरिकेच्या मध्यस्थीसाठी दबाव आणू शकतात. अमेरिकेने गेल्या महिन्यात भारत आणि पाकिस्तानमधील युद्धविरामासाठी आपण मध्यस्थी केल्याचा दावा केला होता, त्यावेळी ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठीदेखील मध्यस्थी करण्याची ऑफर दिली होती. मात्र, भारताने ट्रम्प यांच्या वक्तव्यांना नकार दिला होता. परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) भारताच्या भूमिकेला दुजोरा देत म्हटले होते की, केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित सर्व मुद्दे दोन्ही देशांनी द्विपक्षीय पद्धतीने सोडवले पाहिजेत.

परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते, “आमची दीर्घकाळापासूनची भूमिका राहिली आहे की जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित कोणतेही प्रश्न भारत आणि पाकिस्तानने द्विपक्षीय पद्धतीने सोडवले पाहिजेत. हे धोरण बदललेले नाही. सर्वांना माहिती आहे की, प्रलंबित मुद्दा हा पाकिस्तानने बेकायदापणे व्यापलेल्या भारतीय भूभागाची सुटका करणे,” असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले होते.

मुनीर यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान पाकिस्तानात आंदोलन?

असीम मुनीर यांच्या अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान इम्रान खानच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाने आंदोलन करण्याची धमकी दिली आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार सचिव सज्जाद बुर्की यांनी शनिवारी अमेरिकेच्या वॉशिंग्टनमधील पाकिस्तान दूतावासाबाहेर आंदोलन करण्याचे आवाहन केले. “व्हाईट हाऊसला कळवा की या सरकारबरोबरचा कोणताही करार पाकिस्तानच्या लोकांना मान्य नाही,” असे बुर्की यांनी त्यांच्या ‘एक्स’वर लिहिले. पाकिस्तानी दैनिक ‘डॉन’ने दिलेल्या वृत्तानुसार, आंदोलनांच्या धमक्यांमुळे सुरक्षेची चिंता आदी बाबींमुळे अमेरिका आणि पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी मुनीर यांच्या दौऱ्याबद्दल काहीही बोलणे टाळले आहे.

भारत-पाकिस्तान तणाव आणि मुनीर यांचा दौरा

असीम मुनीर यांचा अमेरिका दौरा हा अमेरिका-चीन शत्रुत्वाशी संबंधित आहे. मात्र, भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवरही हा दौरा नियोजित करण्यात आला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील नऊ दहशतवादी स्थळांवर हल्ले करत, ते तळ उद्ध्वस्त केले होते. हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचला होता. चार दिवसांच्या संघर्षानंतर, दोन्ही देशांकडून युद्धविरामावर सहमती झाली. मात्र, याचे श्रेय राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी घेतले. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्या घोषणेच्या अर्धा तास आधी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी युद्धविरामाची घोषणा केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युरोप दौऱ्यावर असताना परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पॉलिटिकोला सांगितले, “आमचा त्यांना संदेश आहे की, जर तुम्ही एप्रिलमध्ये केलेल्या क्रूर कृत्यांसारखे कृत्य करत राहिलात तर आम्ही कठोर कारवाई करू.” त्यांनी आरोप केला की, पाकिस्तान भारताविरुद्ध हजारो दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत आहे आणि त्यांना भारतात पाठवत आहे. ते म्हणाले, “पाकिस्तान एक असा देश आहे, जो राज्य धोरणाचे साधन म्हणून दहशतवादाचा वापर करण्यात गुंतलेला आहे.”