पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानी अतिरेकी असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर भारताने विविध माध्यमांतून पाकिस्तानची कोंडी करण्यास सुरुवात केली. तसेच भारत आता पाकिस्तानवर हल्ला करणार अशी चर्चाही सुरू झाली. या पार्श्वभूमीवर बांगलादेशमधील निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने वादग्रस्त विधान केले असून त्याचे पडसाद खेळावर उमटू शकतील. भारतीय क्रिकेट संघाचा आगामी बांगलादेश दौरा रद्द होण्याची शक्यताही आता निर्माण झाली आहे.

बांगलादेशी अधिकाऱ्याने काय विधान केले?

बांगलादेशच्या लष्करातून निवृत्त झालेले अधिकारी आणि सध्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांचे निकटवर्तीय असलेल्या एएलएम फझलूर रहमान यांनी भारतविरोधी विधान केले. ‘भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यास बांगलादेशने ईशान्य भारतातील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत,’ असे फझलूर म्हणाले. यासाठी चीनची मदत घेण्याबाबत आता चर्चा सुरू करायला हवी, असेही त्यांनी फेसबुकवरील आपल्या पोस्टमध्ये लिहिले.

बांगलादेशची भूमिका काय?

बांगलादेशातील अंतरिम सरकारने फझलूर यांच्या विधानापासून फारकत घेतली आहे. मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांच्या कार्यालयातील माध्यम सचिव शफीकुल आलम यांनी फझलूर यांनी केलेले विधान हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे स्पष्ट केले. ‘‘सरकार कोणत्याही प्रकारची भूमिका जाहीर व्यक्त करत नाही आणि फझलूर यांनी केलेल्या विधानाशी आम्ही सहमत नाही,’’ असे शफीकुल आलम म्हणाले.

खेळाच्या मैदानावर पडसाद?

फझलूर रहमान यांनी केलेल्या वक्तव्याचे खेळाच्या मैदानावर पडसाद उमटण्याची शक्यता आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) आपल्या पुरुष संघाचा बांगलादेश दौरा रद्द करावा लागू शकेल. भारतीय संघ आता पाकिस्तानविरुद्ध द्विदेशीय मालिका खेळत नाही. यामागे केंद्र सरकारचे धोरण हे मुख्य कारण असल्याचे ‘बीसीसीआय’कडून वारंवार सांगितले जाते. केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय आम्ही संघाला कुठेही पाठवू शकत नसल्याचे ‘बीसीसीआय’चे पदाधिकारी सांगतात. त्यामुळे केंद्र सरकारने भारतीय संघाला बांगलादेश न पाठविण्याचे आदेश दिल्यास ते ‘बीसीसीआय’ला पाळावे लागतील.

भारतीय संघाचा बांगलादेश दौरा कधी?

भारतीय संघ ऑगस्टमध्ये बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणे नियोजित असून उभय संघांत प्रत्येकी तीन एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. या दौऱ्यातील चार सामने मीरपूरच्या शेर ए बांगला स्टेडियमवर, तर उर्वरित दोन सामने चट्टोग्राम येथे रंगणार असल्याचे बांगलादेश क्रिकेट मंडळाने (बीसीबी) काही दिवसांपूर्वीच जाहीर केले होते. एकदिवसीय मालिकेला १७ ऑगस्ट, तर ट्वेन्टी-२० मालिकेला २६ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे, कारण भारतीय संघ बांगलादेशात प्रथमच ट्वेन्टी-२० मालिका खेळणार आहे. मात्र, आता दौराच रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आशिया चषक स्पर्धाही धोक्यात?

भारत आणि पाकिस्तान या देशांतील राजकीय तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच आता बांगलादेशातील निवृत्त लष्करी अधिकाऱ्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आशिया चषक स्पर्धेवरही टांगती तलवार आहे. सध्याच्या परिस्थितीत भारत-पाकिस्तान सामने होण्याची शक्यता फारच कमी आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमान अद्याप निश्चित करण्यात आलेले नाहीत. मात्र, ही स्पर्धा भारतात होणे अपेक्षित आहे. पाकिस्तानचा संघ भारतात येणार नाही. त्यांना त्रयस्थ ठिकाणी खेळावे लागेल. परंतु केंद्र सरकारने खेळाच्या मैदानावरही पाकिस्तानवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतल्यास ही स्पर्धाच रद्द करावी लागू शकेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाकिस्तानच्या खेळाडूंवर समाजमाध्यम बंदी…

पहलगाम येथील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानातील आजी-माजी खेळाडूंच्या इन्स्टाग्राम खात्यावर आणि यूट्यूब वाहिन्यांवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू अर्शद नदीम, तसेच पाकिस्तानचे सध्याचे तारांकित क्रिकेटपटू बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान, नामांकित माजी खेळाडू शोएब अख्तर आणि शाहिद आफ्रिदी यांच्या इन्स्टाग्राम खात्यांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यावर ‘‘हे खाते भारतात उपलब्ध नाही. कायदेशीर विनंतीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे,’’ असा संदेश दिसून येतो. तसेच आफ्रिदी आणि अख्तर यांच्या यूट्यूब वाहिन्यांवरही बंदी घालण्यात आली आहे.