अन्वय सावंत
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या १७व्या हंगामाला सुरुवात होण्याच्या २४ तासांपूर्वी महेंद्रसिंह धोनीने चेन्नई सुपर किंग्ज संघाचे कर्णधारपद सोडण्याचा अनपेक्षित निर्णय घेतला. तसेच आपल्या उत्तराधिकारीची निवडही धोनीनेच केली. त्याने चेन्नई संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सलामीवीर ऋतुराज गायकवाडकडे सोपवली. धोनीने दोन वर्षांपूर्वीही असाच काहीसा निर्णय घेताना रवींद्र जडेजाला कर्णधारपद दिले होते. परंतु, तो निर्णय पूर्णपणे फसला होता. ऋतुराज मात्र या जबाबदारीसाठी पूर्णपणे तयार असल्याची धोनी आणि चेन्नईच्या व्यवस्थापनाला खात्री आहे. आता ऋतुराजपुढे कोणती आव्हाने असतील, तसेच धोनीला मुळात कर्णधारपद सोडावेसे का वाटले, याचा आढावा.

धोनीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय का घेतला?

‘आयपीएल’च्या गेल्या हंगामानंतर धोनी निवृत्त होईल अशी चर्चा होती. मात्र, प्रत्येक स्टेडियममध्ये चाहत्यांनी दिलेले प्रेम पाहून धोनी भारावून गेला आणि त्याने आणखी एक हंगाम खेळण्याचे ठरवले. चाहत्यांना माझे हे ‘रिर्टन गिफ्ट’ आहे असे धोनी अंतिम सामन्यानंतर म्हणाला होता. गेल्या हंगामाच्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव करताना धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईने पाचव्यांदा ‘आयपीएल’चे जेतेपद पटकावले होते. यासह त्यांनी मुंबई इंडियन्सच्या सर्वाधिक जेतेपदांशी बरोबरीही साधली होती. त्यामुळे धोनी खेळत राहण्यामागे मुंबईचा विक्रम मोडणे हेसुद्धा एक कारण असू शकेल असे म्हटले गेले. गेल्या हंगामात गुडघ्याला दुखापत झालेली असतानाही धोनी संपूर्ण स्पर्धा खेळला. परंतु त्याला फलंदाजीत फारसे यश मिळाले नाही. त्यामुळे फलंदाज म्हणून कामगिरीत सातत्य राखण्यात येत असलेले अपयश, तसेच आणखी किती काळ खेळता येईल याबाबत शाश्वती नसणे, वाढत्या वयामुळे दुखापतींचा धोका आणि आपण संघात असतानाच नवे नेतृत्व तयार करणे, याबाबत विचार करून ४२ वर्षीय धोनीने चेन्नईचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्याची शक्यता आहे.

utkarsha rupwate, Shirdi, vanchit,
नाराज उत्कर्षा रुपवते यांचा काँग्रेसचा राजीनामा, वंचितमध्ये प्रवेश; शिर्डीतून लढणार
IPL 2024 Chennai Rajasthan Royals vs Gujarat Titans Match Updates in Marathi
IPL 2024: “असा विचार करू नका…” हर्षा भोगलेंना विजयानंतर शुबमन गिल नेमकं काय म्हणाला, पाहा व्हीडिओ
congress
सांगलीत मैत्रीपूर्ण लढत की माघार ? दिल्लीच्या निर्णयाची काँग्रेस नेत्यांना प्रतीक्षा
Sangli, Vishal Patil, vishal patil sangli,
सांगलीची जागा कॉंग्रेसलाच मिळेल, विशाल पाटलांचा विश्वास; खासदार संजयकाका पाटलांना मैदानात येण्याचे आव्हान

आणखी वाचा- एका ओव्हरमध्ये दोन बाउन्सर! आयपीएलमध्ये यंदा तुफानी फटकेबाजीला ब्रेक लागेल?

कर्णधार म्हणून धोनीची कारकीर्द…

कर्णधार म्हणून भारतीय संघाला दोन विश्वचषक आणि एक चॅम्पियन्स करंडक स्पर्धा जिंकवून देणाऱ्या धोनीने ‘आयपीएल’मध्येही उत्कृष्ट कामगिरी केली. ‘आयपीएल’च्या पहिल्या हंगामापासून (२००८) त्याने चेन्नई सुपर किंग्जच्या नेतृत्वाची धुरा सांभाळली होती. त्याने या संघाला पाच वेळा ‘आयपीएल’चे जेतेपद मिळवून दिले. त्याच्यासह केवळ रोहित शर्माला (मुंबई इंडियन्स) अशी कामगिरी करता आली आहे. तसेच संघमालकाने सट्टेबाजी केल्याच्या प्रकरणात चेन्नई संघावर दोन वर्षांची (२०१६, २०१७) बंदी घालण्यात आली होती. मात्र, धोनीने या संघाची साथ सोडली नाही. तो ही दोन वर्षे रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाकडून खेळला. मात्र, चेन्नईला पुन्हा खेळण्याची परवानगी मिळताच धोनी या संघात परतला. त्यामुळे चेन्नईकरांचे त्याच्यावर प्रचंड प्रेम आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने २१२ पैकी १२८ सामने जिंकले. तसेच त्याने पुणे संघाचे नेतृत्व करताना आणखी पाच सामने जिंकले होते. त्यामुळे विजयांच्या बाबतीत धोनी ‘आयपीएल’मधील सर्वांत यशस्वी कर्णधार आहे.

पुन्हा जडेजाला का निवडले नाही?

चेन्नईच्या सध्याच्या संघात धोनीनंतर जडेजाने या फ्रँचायझीकडून सर्वाधिक सामने खेळले आहेत. मात्र, यावेळी नेतृत्वबदलाचा निर्णय झाल्यानंतर जडेजाऐवजी ऋतुराजला पसंती देण्यात आली. याचे कारण म्हणजे २०२२ च्या हंगामापूर्वी धोनीने चेन्नईचे कर्णधारपद सोडताना जडेजाकडे ही जबाबदारी सोपवली होती. मात्र, या जबाबदारीच्या दडपणाखाली जडेजाचा खेळ खालावला. अष्टपैलू म्हणून त्याने निराशा केलीच, शिवाय कर्णधार म्हणूनही त्याला अपयश आले. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नईला आठपैकी केवळ दोन सामने जिंकता आले. त्यामुळे हंगामाच्या मध्यातच धोनीने चेन्नई संघाच्या कर्णधारपदाची सूत्रे पुन्हा हाती घेतली. त्या हंगामात चेन्नईचा संघ नवव्या स्थानी राहिला. मात्र, पुढच्याच म्हणजेच २०२३च्या हंगामात धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईचा संघ स्पर्धेचा विजेता ठरला. त्यामुळे आता कर्णधारपदासाठी जडेजाचा विचार झाला नाही.

आणखी वाचा- विश्लेषण : यशस्वी, विराट, शुभमन, कमिन्स, कुलदीप… आयपीएलमध्ये यंदा कोण ठरेल लक्षवेधी?

ऋतुराजला पसंती मिळण्यामागे काय कारण?

सध्याच्या घडीला चेन्नईकडे नवा कर्णधार म्हणून ऋतुराज आणि अजिंक्य रहाणे हे दोन सर्वोत्तम पर्याय होते. रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईने नुकतेच रणजी करंडकाचे जेतेपद पटकावले. तसेच तो कर्णधार असताना भारतीय संघाने २०२०-२१मध्ये ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याची किमया साधली होती. त्यामुळे त्याने कर्णधार म्हणून स्वत:ला वारंवर सिद्ध केले आहे. मात्र, रहाणे आता ३५ वर्षांचा आहे. शिवाय गेल्या काही काळापासून फलंदाज म्हणून त्याच्या कामगिरीत सातत्य नाही. याचा विचार करूनच चेन्नईने ऋतुराजला पसंती दिल्याची शक्यता आहे. ऋतुराज केवळ २७ वर्षांचा असून तो आणखी पाच-सहा वर्षे तरी चेन्नईचे कर्णधारपद भूषवू शकेल. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने गेल्या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती. तोसुद्धा धोनीप्रमाणेच शांत स्वभावाचा मानला जातो. त्यामुळे त्याच्यात कर्णधार म्हणून यशस्वी होण्यासाठी सर्व गुण असल्याचा चेन्नईच्या व्यवस्थापनाला विश्वास आहे.

ऋतुराजपुढे कोणती आव्हाने?

ऋतुराजपुढील दोन सर्वांत मोठी आव्हाने म्हणजे चाहत्यांच्या अपेक्षांचे दडपण आणि धोनी संघात असतानाच स्वत:ला कर्णधार म्हणून सिद्ध करणे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईच्या संघाने पाच वेळा ‘आयपीएल’चे जेतेपद पटकावले आणि एकूण १० वेळा अंतिम फेरी गाठली. त्यामुळे चेन्नईच्या चाहत्यांना या यशस्वी कामगिरीची सवय झाली आहे. चेन्नईचा संघ मैदानात उतरल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना विजयाचीच अपेक्षा असते. या अपेक्षा पूर्ण करण्याचे ऋतुराजवर दडपण असेल. तसेच चेन्नई सुपर किंग्ज म्हणजेच धोनी असे समीकरण आहे. धोनीच्या अचूक निर्णयांचीही चाहत्यांना सवय झाली आहे. त्यामुळे ऋतुराजचा एखादा निर्णय चुकला, तर लगेच धोनीकडे कॅमेरा जाणार, धोनी असता तर त्याने असा निर्णय घेतला नसता अशी चर्चा होणार. धोनी संघात असतानाच आपल्यातील नेतृत्वगुण सिद्ध करणे जडेजाला जमले नव्हते. आता ऋतुराजसमोरही हे आव्हान असणार आहे. सलामीवीर म्हणूनही त्याला दमदार कामगिरी सुरू ठेवावी लागणार आहे. यात तो यशस्वी ठरल्यास चेन्नई सुपर किंग्जसह भारतीय संघासाठीही भविष्याच्या दृष्टीने ही आनंदाची बाब ठरेल.