राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आलेली चावडी वाचन योजना आता राज्यभर राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार ऑक्टोबरपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
शाळेमध्ये शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे दिले जातात. मात्र शाळेत जाणाऱ्या आपल्या मुलाने किती ज्ञानार्जन केले याची पालकांनाही उत्सुकता असते. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे मूल्यमापन करण्याबरोबरच त्यातून शिक्षकांच्याही गुणवत्तेचे मूल्यमापन करण्यासाठी चावडी वाचन ही सातत्यपूर्ण व र्सवकष मूल्यमापनाचीच योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेनुसार गावच्या चावडीवर अथवा चौकात पालक, मुले, शिक्षक आणि सरकारी अधिकारी यांच्यासमोर विद्यार्थी आपल्या ज्ञानाचे सादरीकरण करणार आहेत. त्यामध्ये धडा अथवा कवितेचे वाचन, वृत्तपत्र वाचन, एखादा प्रयोग आदीचे विद्यार्थ्यांकडून सादरीकरण केले जाणार असून समोर उपस्थित नागरिक आणि अधिकारी त्याचे मूल्यमापन करणार आहेत. मात्र हा उपक्रम सहज आनंददायी अनौपचारिक वातावरणात घेण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व माध्यमांच्या ६८ हजार शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार असून त्यात शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांस म्हणजेच ८०-८५ लाख  विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची संधी देण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण सचिव अश्विनी भिडे यांनी दिली.
 चावडी वाचनासाठी सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, पंचायत स्तरावरील सर्व यंत्रणा, लोकप्रतिनिधी, शिक्षणप्रेमी, शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक- पालक  आणि माता-पालक संघाचे प्रतिनिधी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि ग्रामस्थांचा सहभाग असेल. चावडी वाचनाच्या कार्यक्रमात वाचन करावयाच्या विद्यार्थ्यांची निवड उपस्थित ग्रामस्थ करणार असल्याने शिक्षकांचा खरा कस लागणार आहे. ऑक्टोबर, डिसेंबर, फेब्रुवारीमध्ये दुसऱ्या किंवा चौथ्या शनिवारी हे चावडी वाचन होणार असून ते तीन तास चालेल. खासगी अनुदानित शाळांनाही दुसऱ्या टप्प्यात हा उपक्रम राबविता येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.