कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मागील वर्षाच्या ऊसाला प्रति टन ४०० रुपये अधिक आणि यावर्षीच्या हंगामासाठी प्रति टन एक रकमी ३,५०० रुपये दराची मागणी केली आहे. त्यांनी हा दर मिळवून दिला तर मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही आणि मागणीप्रमाणे जर शेट्टी कृती करू शकले नाहीत तर त्यांनी निवडणूक लढवू नये, असे जाहीर आव्हान आज शेट्टी यांचे कट्टर विरोधक, माजी कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिले.

यावेळी रयत क्रांती संघटनेचे संस्थापक या नात्याने सदाभाऊ खोत यांनी यावर्षीच्या ऊसाला ३,२५० रुपये मिळाल्यास कारखाने सुरू करण्यास मदत करणार असल्याचेही जाहीर करत एका परीने शेट्टी यांना आव्हान दिले. या आंदोलनात मराठा महाराष्ट्र क्रांती सेनेचे संस्थापक सुरेश दादा पाटील व कुरुंदवाडचे भाजपचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांचा सहभाग असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा : कोल्हापूरमध्ये बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत आप्तस्वकियांनीच दंड थोपटले

शेट्टींना शह

राजू शेट्टी यांनी ऊस दरासाठी आंदोलन सुरू केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात या बाबत झालेल्या तीन बैठकांमध्ये निर्णय झालेला नाही. आता शेट्टी यांनी आंदोलन आणखी तापवण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर सदाभाऊ खोत यांनी आज ऊस दरासाठी ३,२५० रुपये प्रति टन असा नवा पर्याय सुचवत शेट्टी यांना शह दिला आहे. कोणत्याही आंदोलनामध्ये कोठे थांबायचे, हे समजले पाहिजे. यासाठी रामचंद्र डांगे हे साखर कारखानदारांशी येत्या दोन-तीन दिवसांमध्ये चर्चा करून निर्णय घेणार आहेत. ऊस वाळत असल्याने शेतकरीही अडचणीत सापडलेला आहे, असेही खोत म्हणाले.

हेही वाचा : कोल्हापुरात क्रिकेटचा ज्वर शिगेला; क्रिकेटपटूचे फलक, बेटिंग, निळ्या गणवेशाचे वातावरण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकसभेसाठी उमेदवार

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आपण महायुतीकडून निवडणूक लढवणार आहे. यासाठी महायुतीच्या वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू आहे, असेही खोत यांनी यावेळी सांगितले.