कोल्हापूर : राजू शेट्टी हे पुन्हा खासदार होण्यासाठी कारखानदारांना लक्ष्य करून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत. या आगीत शेतकरी पुरता भाजून निघत असल्याने यावर्षी कोणत्याही परिस्थितीत कारखान्याला ऊस घालवण्याच्या दृष्टीने शेतकरी प्रयत्नशील आहे. शेतकरी हा शेट्टी यांच्या भूलथापांना बळी न पडता आपला ऊस घालवण्यासाठी आता रस्त्यावर उतरणार आहे. संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेट्टी यांचे आंदोलन शेतकऱ्यां‍चे नुकसान करणारे आहे, असा आरोप कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष व ज्येष्ठ नेते रामचंद्र डांगे यांनी केला.

डांगे म्हणाले, “गतवर्षीच्या बिलापोटी ४०० रुपये आणि यंदाच्या उसाला प्रतिटन ३५०० या मागणीसाठी ऊसतोड रोखून ठेवत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. पाण्याच्या कमतरतेने आधीच उसाची घट झाली आहे. अशात आंदोलनामुळे ऊस वाळू लागला असल्याने शेतकऱ्यांच्या नुकसानीला सर्वस्वी राजू शेट्टीच जबाबदार आहेत.”

हेही वाचा : “राज्यात जातीय तेढ निर्माण करणाऱ्या छगन भुजबळ यांना मुख्यमंत्र्यांनी रोखावे”, मनोज जरांगे पाटील यांची मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकसभेच्या तोंडावर आंदोलन

गेली चार वर्षे माजी खासदार राजू शेट्टी यांना आंदोलन का सुचले नाही? त्यांना लोकसभेच्या तोंडावरच आंदोलन सुचले असून ते आता शेतकऱ्यांना समजू लागले आहे. पदयात्रा आणि जयसिंगपूर येथे केलेले ठिय्या आंदोलन करून शेतकरी हिताचे आंदोलन करत असल्याचा देखावा त्यांनी केला आहे, असा आरोप डांगे यांनी केला.