कोल्हापूर : कोल्हापूर चित्रनगरीतील सुमारे ७८ एकरांवर येत्या महिन्याभरात सुमारे १५ कोटी रुपयांची विविध विकासकामे सुरू होतील. या ठिकाणी चित्रपट विषयक प्रशिक्षण केंद्र सुरू होण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी येथे केले. येथे चित्रनगरीतील विकासविषयक कामांसंदर्भात आयोजित चर्चासत्रावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
यावेळी खा. शाहू महाराज छत्रपती, खा. धनंजय महाडिक, ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे, महेश जाधव, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे, चित्रपट अभिनेते- कवी सौमित्र ऊर्फ किशोर कदम, अभिनेते सागर तळाशीकर, ज्येष्ठ विचारवंत उदय नारकर, सिने अभ्यासक प्रा. कविता गगराणी, तरुण दिग्दर्शक सचिन सूर्यवंशी आदी उपस्थित होते .
शेलार पुढे म्हणाले, कोल्हापूर हे केवळ मराठीच नाही तर दक्षिणात्य, हिंदी तसेच इतर भाषीय चित्रपटांसाठी एक आदर्श व अद्ययावत चित्रीकरणाचे केंद्र होईल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगून चित्रपट निर्मितीबाबत ‘स्क्रिप्ट टू प्रिंट’ ही संकल्पना अंमलात आणण्यासाठी आपला विभाग कार्यरत राहील. यासाठी निधीची कमतरता जाणवणार नसल्याचेही सांगितले.
कोल्हापूर चित्रनगरी ही केवळ पर्यटनाचे अथवा महसूल मिळविण्याचे आर्थिक केंद्र अथवा ठिकाण न राहता ते अद्यावत चित्रपटसृष्टीचे ठिकाण असावे असाच सूर सर्व मान्यवरांच्या तोंडून निघाला. यावेळेस विविध मान्यवरांनी चित्रनगरी विकासाच्या अनुषंगाने आपले विचार व्यक्त करताना भविष्यातील कोल्हापूरची चित्रनगरी कशी असावी याचे संकल्पचित्र उभे केले.
चित्रपट अभिनेते किशोर कदम म्हणाले, कान्स चित्रपट महोत्सवाच्या धर्तीवर कोल्हापूर येथील चित्रपट निर्मितीची एक विशेष ओळख निर्माण व्हावी. अभिनेते सागर तळाशीकर म्हणाले, या चित्रनगरीचा पर्यटन हा उद्देश राहू नये या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित इमारतींच्या खर्चापेक्षा येथील प्राथमिक सुविधांवर अधिक खर्च व्हावा. प्रा. कविता गगराणी म्हणाल्या, कोल्हापूरच्या वैभवशाली इतिहासाला जागूनच चित्रनगरीतील कामांची उभारणी करण्यात यावी तसेच येथील चित्रपट विषयक ऐतिहासिक ठेवा जतन व्हावा.
चांगल्या निर्मितीसाठी उपजत द्रष्टेपण आवश्यक असते. ते या कोल्हापूरच्या मातीत आहे. चित्रपट विषयक जागतिक तंत्रज्ञान या ठिकाणी उपलब्ध व्हावे. यासाठी शासनाने आवश्यक ते सर्व पाठबळ द्यावे, असे मत उदय नारकर यांनी व्यक्त केले तर चित्रनगरी उभारताना केवळ महसूल गोळा करणे या उद्देशाने नाही तर ती कला जगावी, अधिक सशक्त व्हावी यासाठी प्रयत्न व्हावेत, असे मत श्री. सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र – दिनमानने या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून भूमिका पार पाडली. चित्रनगरीत सध्या २०० जणांना आर्थिक रोजगार उपलब्ध झाला असून येथे विविध विकास कामे सुरू असल्याचे संचालक बिभीषण चवरे यांनी प्रास्ताविकात सांगितले . भविष्यातील चित्रनगरी कशी असावी याचे संकल्पचित्र डोळ्यां व कानांमध्ये साठवण्यासाठी अनेक सिने / कलाप्रेमी यावेळी मोठ्या संखेने उपस्थित होते.