कोल्हापूर : इचलकरंजी शहरासाठी सुळकूड पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याचा मुद्दा तापला असताना याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. हि माहिती अवर सचिव निलेश पोतदार यांनी बुधवारी कळविले आहे.

यापूर्वी एकदाही बैठक ११ सप्टेंबर रोजी होण्याचे ठरले होते. मात्र ती काही कारणामुळे होऊ शकली नाही. ही बैठक घ्यावी यासाठी इचलकरंजीकरांनी सातत्याने पाठपुरावा चालू ठेवला होता. तर कागलमधूनही यासाठी मागणी होत होती.

हेही वाचा >>>सुळकुड पाणी प्रश्नासाठी मुख्यमंत्री आणि मंत्री खाडे यांना रविवारी इचलकरंजीत काळे झेंडे दाखवणार

आंदोलनामुळे वातावरण तापले

इचलकरंजी महापालिकेसाठी कागल तालुक्यातील दूधगंगा नदीतून सुळकुड पाणी योजना मंजूर झाली आहे. या पाणी योजनेच्या मागणीसाठी इचलकरंजीतील आम्ही सावित्रीच्या लेकी या संघटनेच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले होते. तर या योजनेला विरोध करत  कागल तालुक्यातील आम्ही जिजाऊंच्या लेकी या मंचाखाली सुळकुड बंधाऱ्यावर प्रति आंदोलन सुरू केले होते.

कांडका पडणार?

दोन्ही आंदोलनावेळी याप्रश्नी मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेण्यात येईल असे आश्वासन दिले होते. त्यानुसार हि बैठक होत असून या वादग्रस्त प्रश्नाचा राज्यशासन कोणता कंडका पडणार याला महत्व आहे आहे. 

हेही वाचा >>>मुख्यमंत्री शिंदे पुन्हा कोल्हापुरात, हातकणंगले मतदारसंघासाठी लक्ष घातले

मान्यवरांची उपस्थिती

 या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आवाडे, आमदार सतेज पाटील, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार सुरेश हाळवणकर, संजय घाटगे, उल्हास पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह संबंधित शिष्टमंडळ, जलसंपदा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकारी, राजकीय प्रतिनिधी व संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

विरोधाचे नारे

दूधगंगा नदीकाठच्या लोकांनी योजना मंजूर झाली तेव्हाच विरोध केला होता. तर आता निधी मंजूर झाल्यावरही त्यांनी पुन्हा विरोधाचे अस्त्र बाहेर काढले आहे. कागल व शिरोळ तालुका आणि उत्तर कर्नाटकातील काही गावे ही दूधगंगा बचाव कृती समितीच्या माध्यमातून एकवटली आहेत. तेथील सर्वपक्षीय नेतृत्वाने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून इचलकरंजी नळ पाणी योजनेला प्रखरपणे विरोध दर्शवला. ही योजना रद्द करावी, त्याचा फेरविचार केला जावा, योजना राबवण्याचा प्रयत्न झाल्यास कोणालाही फिरू देणार नाही. तिची मोडतोड केली जाईल, असा आक्रमक पवित्रा घेतला आहे. इचलकरंजीला पाणी दिल्याने ग्रामीण भागातील शेतीच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होतील अशी भीतीही त्यांना वाटत आहे. इचलकरंजीच्या पंचगंगा व कृष्णा योजना सक्षम कराव्यात, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

हेही वाचा >>>कोल्हापुरातील २ हजार दिवे बंद; आपचा महापालिकेवर कंदील मोर्चा

इचलकरंजीकर आग्रही

 कागलकरांचा विरोधात असताना इचलकरंजीच्या दूधगंगा योजनेसाठी आपलाच पाठपुरावा कारणीभूत ठरला, अशी भूमिका घेणारे आता मात्र लोकप्रतिनिधी कोणतीच भूमिका स्पष्ट करता नसल्याने इचलकरंजीकरांना सखेद आश्चर्य वाटल्यापासून राहिलेले नाही. लोकप्रतिनिधी, नेते यांची ही भूमिका लक्षात घेऊन ‘ पाण्यासाठी मी इचलकरंजीकर ‘ हे घोषवाक्य योजना राबवण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी तरुणांची एक बैठक पार पडली. त्यामध्ये नळ पाणी योजनेला विरोध करू नये, विरोधाचे मुद्दे खोडून काढण्यात येतील, त्यासाठी गैरसमज दूर करणारे माहितीपत्रक तयार केले जाईल असा निर्णय घेण्यात आला.

एकमेकांकडे बोट

 मोठे प्रकल्प राबवताना एकमेकांची भूमिका समजून प्रतिसाद देणे अपेक्षित असते. त्याचा अभाव येथे दिसत आहे. दुधगंगा काठच्या लोकांनी इचलकरंजीकरांनी शेजारच्या पंचगंगा दूषित नदी स्वच्छ करून घ्यावी,  असा सल्ला दिला आहे. तर इचलकरंजीकरांनी पंचगंगेचे प्रदूषण कोल्हापूर महापालिकेमुळे अधिक झाले, असे म्हणायला सुरुवात केली आहे. इचलकरंजीच्या खाली राहणाऱ्या गावांनी इचलकरंजी नगरपालिकेच्या प्रदूषणामुळे आम्हाला दूषित पाणी प्यावे लागते, असा सूर लावला आहे. एकमेकांकडे बोट दाखवल्यामुळे संवाद घडण्याऐवजी विसंवाद निर्माण झाला आहे.

 संयमी भूमिका अपेक्षित

 इचलकरंजीकरांना पाण्याची गरज आहे त्यासाठी दूधगंगा काठच्या लोकांनी आपली भूमिका विधायक मार्गाने पटवून दिली पाहिजे. मात्र काही अति उत्साही इचलकरंजीला पाणी आणणारच, प्रसंगी संघर्ष करू, असे समाज माध्यमातून मांडायला सुरुवात केली आहे. अशीच चिथावणीखोर भूमिका वारणा नळ योजनेच्या वेळी अडचणीची ठरली होती. इतिहासातून काही बोध न घेता पुन्हा तीच आक्रमकता ठेवली तर मार्ग सुकर असणार नाही याचे भान उरलेले दिसत नाही. इचलकरंजीसाठी पाण्याचा आग्रह धरणाऱ्यांनी अशाअनाठायी आक्रमकांना आवर घालण्याचीही गरज आहे.