संध्यादेवी यांच्या जागी कन्येचा निवडणूक लढण्याचा निर्धार
दयानंद लिपारे, कोल्हापूर</strong>
विधानसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या चंदगडच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांचा घेतला. तसेच कन्येने डॉ. नंदिनी बाभुळकर यांनीही निवडणूक लढवू नये असे मत व्यक्त केले. मात्र, बाभुळकर यांनी चंदगड मधून रिंगणात उतरण्याची घोषणा केली. आता प्रश्न इतकाच आहे की त्या आई-वडील यांच्याप्रमाणे घडयाळ चिन्हावर लढणार की, नागपूर हे सासर असलेल्या बाभुळकर या कमळ जवळ करणार. कोल्हापूर जिल्ह्य़ाच्या राजकारणात कुपेकर हे बडे प्रस्थ. मूळचे काँग्रेसचे बाबा कुपेकर हे शरद पवार यांच्या बरोबर राष्ट्रवादीमध्ये गेले. मंत्रिपद, विधानसभा अध्यक्षपद त्यांनी भूषवले. २०१३ मध्ये बाबासाहेब कुपेकर यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत पत्नी संध्यादेवी यांनी विजय मिळवला होता.
घराण्यातील भाऊबंदकी : गेल्या विधानसभा निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या तेव्हा े निवडणूक न लढण्याचा निर्णय आमदार कुपेकर यांनी जाहीर केला. त्याला कारण होते घरातील वाद. बाबासाहेब कुपेकर यांचे पुतणे संग्रामसिंह कुपेकर यांनी पोटनिवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हाची अपुरी राहिलेली इच्छा २०१४ सालच्या निवडणुकीत पूर्ण करण्याच्या दिशेने संग्रामसिंह कुपेकर यांची वाटचाल सुरू होती. याच पाश्र्वभूमीवर आमदार कुपेकर यांनी तेव्हा निवडणूक न लढविण्याचा निर्णय जाहीर केला होता. ‘काही काळची निवडणूक होईल, परंतु घराण्यात कायमस्वरूपी वितुष्ट निर्माण होईल’, अशी प्रगल्भता त्यांच्या बोलण्यात होती. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवून कुपेकर यांनी जनसुराज्यशक्ती पक्षाचे उमेदवार पुतणे संग्रामसिंह यांना चौथ्या स्थानी टाकले. पुढे संग्रामसिंह यांनी शिवसेनेत प्रवेश केला .
उमेदवारीची उत्सुकता : सप्टेंबर महिना कुपेकर – बाभुळकर यांच्यासाठी वेगळ्या राजकीय वाटा निर्माण करणारा ठरला. संध्यादेवी यांचा वारसा कन्या डॉ. नंदिनी बाभुळकर या चालवणार अशी शक्यता होती.विधानसभा निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्यावर कुपेकर यांनी निवडणूक न लढण्याचे ठरवले होते. सप्टेंबर महिन्यात चंदगड मतदारसंघातील उमेदवारीच्या मुद्दय़ावरून डॉ. नंदिनी बाभुळकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.तर संध्यादेवी कुपेकर यांनी मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली. पवार यांनी त्यांना ‘तुमच्याऐवजी बाबासाहेब कुपेकर यांच्या कार्याचा वारसा पुढे चालवण्यासाठी कन्या डॉ. नंदिनी यांना उमेदवारी देऊ’, असा पर्याय सुचवला. मुलीने राजकारणात न पडता थांबावे असाही निर्णय मी घेतला आहे’, असे संध्यादेवी यांनी जाहीर केले. परंतु, दोनच दिवसांत बाभुळकर यांनी मेळावा घेऊन निवडणूक लढण्याचा इरादा व्यक्त केला.