कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रिडांगणावर गुरूवारी (दि. १६) २४ वी ऊस परिषद होणार असून यावर्षी ऊसाला पहिली उचल किती घ्यायची व आंदोलनाची पुढील दिशा कोणती असणार हे या परिषदेमध्ये ठरणार आहे..
परिषदेबाबत माहिती देताना प्रदेश उपाध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी मंगळवारी सांगितले की, गेल्या २४ वर्षापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ऊस गळीत हंगाम सुरू होण्याआधी ऊस परिषदेच्या माध्यमातून आंदोलनाची एल्गार पुकारून दर निश्चीती झाल्यानंतर साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होतात. यावर्षी सांगली , कोल्हापूर , सातारा , सोलापूर व उत्तर कर्नाटक सीमाभागातील गावा गावात ऊस परिषदेची तयारी करण्यात येत आहे.
गेल्या पंधरा दिवसापासून विविध भागामध्ये शेतकरी मेळावे , पदाधिकारी बैठका तसेच प्रसार माध्यमातून ऊस परिषदेची तयारी करण्यात आली आहे. विशेषता काटामारी , उतारा चोरी, तोडणी वाहतूक व उपपदार्थामधून साखर कारखानदार लुबाडणूक करू लागले आहेत. या सर्व मुद्यांमुळे यंदाची ऊस परिषद जोरदार होणार असल्याची माहिती विठ्ठल मोरे यांनी दिली.
मोरे म्हणाले की , गेल्या पाच वर्षात एफ. आर. पी ( उसाचे उचित व लाभकारी मूल्य) मध्ये ६५० रूपयाची वाढ झाली आहे. मात्र ऊसाचा दर ३ हजार ते ३२०० पर्यंत स्थिर राहिलेला आहे. खते ,बि -बियाणे, किटकनाशके , मजूरी यामध्ये भरमसाठ वाढ झाल्याने उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. राज्य सरकार व साखर संघ एक रक्कमी एफ. आर. पी. मध्ये मोडतोड करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांना पहिली उचल २५०० रूपये व मराठवाडा विदर्भातील शेतक-यांना २ हजार ते २२०० रूपये पहिली उचल मिळणार असून यामुळे मोठा फटका ऊस उत्पादक शेतक-यांना बसणार आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष अजित पोवार , डॅा. बाळासाहेब पाटील , डॅा. महावीर अक्कोळे , आणणासो चौगुले , रामचंद्र फुलारे, सुभाष शेट्टी , सचिन शिंदे , तानाजी वठारे , बंडू चौगुले , शंकर नाळे , बंडू पाटील , विक्रम पाटील , नितेश कोगनोळे , कुमार सुतार , श्रीकांत पाटील यांच्यासह स्वाभिमानीचे पदाधिकारी उपस्थित होते. स्वाभिमानीची जिल्हास्तरीय बैठकीत शेट्टी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधल. यंदाही संघटनेने ऊस दराच्या मुद्यावरून एल्गार पुकारला आहे.
जयसिंगपूर येथे दि. १६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या परिषदेत सहभागी होण्याचे आवाहन शेट्टी यांनी केले. शेट्टी म्हणाले की, तरुण शेतकरी शेतीत उतरल्याने अन्याय सहन करणार नाहीत. ऊस दर ठरवण्यासाठी यंदा संघर्ष अटळ आहे. वारकरी जशी पंढरपूरची वारी चुकवत नाहीत, तशी जयसिंगपूरची ऊस परिषदही शेतकऱ्यांनी चुकवू नये. दरम्यान, जर कारखानदार सत्तेच्या बळावर शेतकऱ्यांना लुटण्याचा प्रयत्न करतील, तर जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा बैठकीत देण्यात आला.