लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : खासदारांनी आत्तापर्यंत काय केले? भाजपच्या लोकांशी बोलताना लोक त्यांना बदला असे म्हणतात, अशी टीका भाजपला पाठिंबा दिलेले अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी खासदार धैर्यशील माने यांचे नाव न घेता केली. या टिकेला पक्षाच्या महाअधिवेशनामध्ये उत्तर देऊ, अशी भूमिका खासदार माने यांनी बुधवारी व्यक्त केली.

शिरदवाड (ता. शिरोळ) येथे विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रम आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर होते. यावेळी आवाडे यांनी राजकीय टोलेबाजी केली. इकडे भाजपमध्ये आम्हाला चार हात लांब ठेवून राजकारण सुरू आहे. ते कोण करते हे सगळ्यांना माहिती आहे, असे म्हणत आवाडे यांनी भाजपचे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांना चिमटा काढला.

आणखी वाचा-शिवाजी विद्यापीठाचे ५ कोटी ४२ लाख तुटीचे अंदाजपत्रक मंजूर; सदस्यांची टीका

लोक म्हणतात; आम्ही नाही

देशात तिसऱ्यांदा मोदी हेच पंतप्रधान होणार. जगात भारी अशी त्यांची चर्चा आहे. परंतु इथे खासदार कोण आहेत. त्यांनी या भागाचा आतापर्यंत काय दिले याचे उत्तरे लोक मागत आहेत. याबाबत तुमचे आणि आमचे वरिष्ठ नेते काहीतरी निर्णय घेतील. आम्ही काही कोणाला बदला म्हणत नाही. वरिष्ठ जो निर्णय घेतील त्याच्या पाठीशी राहणार आहे, असेही आवाडे म्हणाले.

पाटील, मुश्रीफ निशाण्यावर

आमदार यड्रावकर महाविकास आघाडीत मंत्री होतात. तुमचा आम्हाला कधी त्रास झाला नाही. जिल्ह्यातील दोन मंत्र्यांनी आम्हाला खूपच त्रास दिला. त्यातील एक मंत्री मुश्रीफ आता आमच्या सामील झाले आहेत. त्यामुळे त्यांचा त्रास आता कमी झाला आहे, असे म्हणत आवाडे यांनी सतेज पाटील यांच्यावरही टीका केली.

आणखी वाचा-अवैध गर्भलिंग निदान प्रकरणी आणखी एक डॉक्टर अटकेत; एकूण सातजण जेरबंद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुत्रासाठी रणनीती

दरम्यान, आवाडे यांची ही राजकीय टोलेबाजी म्हणजे लोकसभा निवडणुकीसाठी हातकणंगले लोकसभा मतदार संघात पुत्र राहुल आवाडे यांना उमेदवारी मिळण्यासाठी केलेली रणनीती असल्याची चर्चा सुरू आहे. त्यांच्या या संभाषणाची चित्रफीत समाज माध्यमात अग्रेषित होत आहे.