भारत विरुद्ध न्यूझीलंडदरम्यानच्या टी-२० मालिकेमधील सलग दुसऱ्या सामन्याचा निकाल सुपर ओव्हरने लागला. अखेरच्या षटकांत शार्दुल ठाकूरने केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर सलग दुसऱ्या सामन्यात भारताने सुपरओव्हरमध्ये विजय मिळवला आहे. वेलिंग्टनच्या मैदानावर भारताने विजयासाठी दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ निर्धारीत षटकांमध्ये १६५ धावांपर्यंतच मजल मारु शकला. यानंतर सुपरओव्हरमध्ये भारतीय संघाने पुन्हा एकदा १४ धावांचं आव्हान सहज पार करत विजय मिळवला. या विजयासह भारताने ५ सामन्यांच्या मालिकेत ४-० अशी आघाडी घेतली आहे. या विजयानंतर सोशल मिडियावर #SuperOver हा हॅशटॅग ट्रेण्ड होताना दिसत आहे. अनेकांनी या सामन्यासंदर्भात ट्विटवरुन प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. स्टॅण्डअप कॉमेडियन असणाऱ्या झाकीर खानने या सामन्यासंदर्भात केलेले ट्विट अनेकांना पसंत पडले असून काही मिनिटांमध्ये त्याला हजारहून अधिक रिट्विट मिळाले आहेत.

काय म्हणाला आहे झाकीर खान?

आपल्या सादरीकरणामुळे स्टॅण्डअप कॉमेडीयन्सच्या गर्दीत उठून दिसणारा झाकीर सोशल नेटवर्किंगवर चांगलाच अॅक्टीव्ह आहे. इथेही अनेकदा तो आपला हजरजबाबीपणा दाखवत असतो. असेच एक ट्विट त्याने भारताने न्यूझीलंडला पराभूत केल्यानंतर केलं आहे. “सरळ सरळ २१ षटकांचा सामना ठेवत जा. रोज रोज काय आमचा बीपी (रक्तदाब) वाढता,” असं ट्विट झाकीरने केलं आहे.

तासाभरामध्ये दिड हजारांहून अधिक जणांनी हे ट्विट रिट्विट केलं आहे. अनेकांनी या सामन्यानंतर न्यूझीलंड संघाची मस्करी करणारे ट्विट केले आहेत. मागील १२ वर्षांमध्ये न्यूझीलंडने खेळलेल्या सामन्यांपैकी सात सामन्यांचा निकाल सुपर ओव्हरने लागला. त्यापैकी चक्क सहा सामन्यांमध्ये न्युझीलंडचा पराभव झाला आहे. या सहा पैकी प्रत्येकी दोन सामन्यांमध्ये वेस्ट इंडिज आणि भारताने न्यूझीलंडचा पराभव केला आहे.