वृत्तसंस्था, सिडनी

न्यूझीलंडविरुद्धच्या दारुण पराभवामुळे भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास खालावला असेल. मात्र, त्यांच्यातील दमदार पुनरागमनाची क्षमता आम्हाला ठाऊक आहे. त्यांना कमी लेखण्याची चूक आम्ही निश्चितपणे करणार नाही, असे वक्तव्य ऑस्ट्रेलियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने केले.

मायदेशातील कसोटी क्रिकेट मालिका ०-३ अशा फरकाने गमाविण्याची नामुष्की भारतावर ओढवली. यामुळे भारतीय खेळाडू मानसिकदृष्ट्या खचले असतील, ज्याचा आगामी बॉर्डर-गावस्कर करंडक मालिकेत ऑस्ट्रेलियाला फायदा होऊ शकेल, असे ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू अॅडम गिलख्रिास्ट आणि डेव्हिड वॉर्नर म्हणाले होते. हेझलवूडचेही असेच काहीसे मत असले, तरी या नव्या मालिकेत भारतीय संघ खेळ उंचावेल याचीही त्याला जाण आहे.

हेही वाचा >>>‘ऑलिम्पिक’साठी भारताचा प्रस्ताव; २०३६मधील स्पर्धांच्या आयोजनासाठी ‘आयओसी’ला पत्र

‘‘न्यूझीलंडविरुद्धच्या अपयशामुळे भारतीय खेळाडू कदाचित खडबडून जागे झाले असतील. ते आमच्याविरुद्ध दमदार पुनरागमन करण्यास उत्सुक असतील. त्यांच्यातील क्षमता आम्हाला ठाऊक आहे. आता ते कसे खेळतात हे मालिका सुरू झाल्यावरच कळेल,’’ असे हेझलवूड ऑस्ट्रेलियातील एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.

बॉर्डर-गावस्कर करंडकासाठी होणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला २२ नोव्हेंबरपासून सुरुवात होईल. न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवामुळे भारतीय संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याचा मार्गही अवघड झाला आहे. अन्य संघांवर अवलंबून न राहता अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलियातील पाचपैकी चार सामने जिंकावे लागणार आहेत.

‘‘भारतीय संघ मालिका ३-० अशी जिंकण्यापेक्षा ०-३ अशी हरून ऑस्ट्रेलियात येणे, जे आमच्यासाठी चांगलेच आहे. त्यांचा आत्मविश्वास काहीसा खालावला असेल. भारताचे बरेचसे खेळाडू यापूर्वी ऑस्ट्रेलियात खेळले आहेत. मात्र, त्यांच्या काही फलंदाजांना इथे खेळण्याचा अनुभव नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या आणि परिस्थिती कशी असणार, याबाबत ते थोडे संभ्रमात असतील. आम्हाला याचा निश्चितपणे फायदा होऊ शकेल. परंतु आम्ही त्यांना कमी लेखण्याची चूक करणार नाही,’’ असे हेझलवूड म्हणाला.

हेही वाचा >>>Afro Asia Cup: भारत पाकिस्तानचे खेळाडू दोन दशकांनंतर एकाच संघातून खेळणार? लोकप्रिय क्रिकेट मालिकेबाबत मोठी अपडेट

तसेच हेझलवूडने न्यूझीलंडचेही कौतुक केले. ‘‘न्यूझीलंडने उत्कृष्ट खेळ केला. भारतात जाऊन ३-० अशा फरकाने कसोटी मालिका जिंकणे हे अविश्वसनीय आहे. भारतातील मालिकेमध्ये प्रतिस्पर्ध्यांना एक सामना जिंकणेही अवघड जाते, तिथे न्यूझीलंडने मालिकेतील सर्व सामने जिंकून दाखवले. त्यांचे हे यश खूपच मोठे आहे,’’ असे हेझलवूडने नमूद केले.

राहुलवर दडपण राखणार बोलँड

भारताचा अनुभवी फलंदाज केएल राहुल सध्या धावांसाठी झगडत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यानंतर त्याला अंतिम ११ खेळाडूंतून वगळण्यात आले होते. आता आगामी बॉर्डर-गावस्कर करंडक मालिकेतही राहुलवर दडपण राखण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे ऑस्ट्रेलियाला वेगवान गोलंदाज स्कॉट बोलँड म्हणाला. राहुलने २०१५ मध्ये ऑस्ट्रेलियात कसोटी पदार्पण केले होते. आपल्या पहिल्या मालिकेत त्याने सिडनी येथे ११० धावांची खेळीही केली होती. मात्र, ऑस्ट्रेलियात त्याला एकूण केवळ २०.७७च्या सरासरीने धावा करता आल्या आहेत. ‘‘राहुल गुणवान खेळाडू आहे. मात्र, त्याच्यावर आम्ही दडपण आणू शकतो असे मला वाटते. आम्ही त्याला संपूर्ण मालिकेत दडपणाखाली ठेवू अशी आशा आहे. आम्ही त्याला रोखू शकतो,’’ असे बोलँडने नमूद केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अॅशेसइतकेच महत्त्व…

बॉर्डर-गावस्कर करंडकाला अॅशेसइतकेच महत्त्व असल्याचे हेझलवूडने नमूद केले. ‘‘आमच्यासाठी ही खूप मोठी मालिका आहे. आमच्या दृष्टीने या मालिकेला अॅशेसइतकेच महत्त्व आहे. प्रत्येक सामन्यासाठी स्टेडियम पूर्ण भरलेले असेल याची मला खात्री आहे. यंदा प्रेक्षकसंख्येचा विक्रमी आकडा गाठला जाईल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियात या मालिकेबाबत खूप उत्सुकता आहे,’’ असे हेझलवूडने सांगितले.