BCCI Secretary Jay Shah on Shreyas Iyer and Ishan Kishan : बीसीसीआयने सर्व केंद्रीय करार असलेल्या खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळणे अनिवार्य केले आहे. ज्यामुळे जे क्रिकेटपटू तंदुरुस्त आहेत आणि राष्ट्रीय कर्तव्यावर नाहीत त्यांना देशांतर्गत स्पर्धा खेळावी लागत आहे. काही दिवसापूर्वी बोर्डाच्या या सूचनांचे पालन न केल्याने इशान-श्रेयसला केंद्रीय करारातून वगळण्यात आले होते. कारण ते तंदुरुस्त असूनही देशांतर्गत सामने खेळले नाहीत. आता हे दोघेही देशांतर्गत खेळताना दिसणार आहेत. यावर बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले, कठोर कारवाईमुळे दोन्ही खेळाडू देशांतर्गत स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

कठोर पावलांमुळेच श्रेयस-इशान देशांतर्गत स्पर्धेत सहभागी –

आता श्रेयस अय्यर आणि इशान किशन हे दोघेही आगामी दुलीप ट्रॉफीचा भाग आहेत, जी ५ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. बीसीसीआयच्या कठोर कारवाईमुळे दोन्ही खेळाडूंनी हा निर्णय घेतल्याचे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, ‘दुलीप ट्रॉफी संघाकडे बघितले तर रोहित आणि विराट व्यतिरिक्त इतर सर्व खेळाडू खेळताना दिसतील. आम्ही उचललेल्या कठोर पावलांमुळेच श्रेयस अय्यर आणि इशान किशन दुलीप ट्रॉफी खेळत आहेत.’

देशांतर्गत क्रिकेटमध्ये फिटनेस सिद्ध केल्यानंतरच भारतीय संघात संधी –

जय शाह पुढे म्हणाले, ‘आम्ही थोडे कठोर आहोत. रवींद्र जडेजा जखमी झाला, तेव्हा मीच त्याला फोन करून देशांतर्गत सामने खेळायला सांगितले. आता हे निश्चित झाले आहे की जो दुखापतग्रस्त आहे, तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये फिटनेस सिद्ध केल्यानंतरच भारतीय संघात सामील होऊ शकतो.” विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराह यांना वर्कलोड मॅनेजमेंट अंतर्गत विश्रांतीची परवानगी देण्यात आली आहे.

हेही वाचा – Vinesh Phogat : ‘देव तुला सद्बुद्धी देवो…’, मेहुणा पवन सरोहा विनेशवर का संतापला? तर बहीण गीता म्हणाली, ‘कर्माचीच फळं…’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१९ सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेला सुरुवात –

आता भारताच्या पुढील मालिकेतील पहिला सामना महिनाभरानंतर होणार आहे. १९ सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. बीसीसीआयचे सचिव पुढे म्हणाले, ‘विराट आणि रोहितला देशांतर्गत क्रिकेट खेळायला सांगून त्यांच्यावर अधिक भार टाकण्यात काही अर्थ नाही. कारण त्यामुळे त्यांना दुखापत होण्याचा धोका आहे. तुम्ही जर इंग्लंड-ऑस्ट्रेलियाकडे पाहिले, तर तुमच्या लक्षात येईल की त्यांचा एकही स्टार खेळाडू देशांतर्गत क्रिकेट खेळत नाही. त्यामुळे आपणही आपल्या खेळाडूंशी आदराने वागले पाहिजे.’