टी २० वर्ल्डकप सुरू झाल्यापासून भारत हा विश्वचषक जिंकेल असं आजी-माजी क्रिकेटपटूंचं म्हणणं आहे. मात्र पाकिस्तानकडून पहिल्याच सामन्यात पराभव स्वीकारावा लागल्याने क्रीडाप्रेमींनी उत्सुकता ताणली गेली आहे. आता उपांत्य फेरी गाठण्यासाठी भारताची गणितं कशी असतील?, यावर अंदाज बांधले जात आहेत. मात्र ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रेट ली ने यंदाचा वर्ल्डकप भारतच जिंकेल, असं पुन्हा एकदा सांगितलं आहे.

“भारत तीन फिरकीपटूंना खेळवू शकला असता. मात्र भुवनेश्वर आणि मोहम्मद शमी चांगले गोलंदाज आहेत. जर त्यांना यश मिळालं नाही तर कुणाला मिळणार? त्यांच्याकडे चांगली टीम होती. मात्र यासाठी पाकिस्तान संघाला श्रेय दिलं पाहीजे, ते चांगले खेळले. मला वाटतं भारतासाठी एकमात्र विराट कोहली होता. त्याने अर्धशतक झळकावलं. तसेच आफ्रिदीच्या गोलंदाजीवर षटकार ठोकला. माझ्या मते ते योग्य होतं”, असं ब्रेट लीने एएनआयशी बोलताना सांगितलं. “केएल राहुल अपयशी ठरला. त्याने आयपीएलमध्ये चांगल्या धावा केल्या होत्या. मात्र आयपीएलमध्ये त्याने अतिरिक्त वेगवान गोलंदाजीचा सामना केला नव्हता.”, असंही त्याने पुढे सांगितलं.

“आराम करा, सर्व काही ठीक होईल. जर त्यांना त्यांच्या क्षमतेवर आणि प्रतिभेवर विश्वास असेल तर ते चांगले खेळतील. कदाचित यावेळी भारत-ऑस्ट्रेलिया फायनल होईल.” असंही ब्रेट ली याने पुढे सांगितलं. भारताचा पुढचा सामना ३१ ऑक्टोबरला न्यूझीलंडसोबत आहे.