India vs South Africa 1st Test 2nd Day Updates : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनमध्ये खेळवला जात आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा दक्षिण आफ्रिका संघाने ५ गडी गमावून २५६ धावा केल्या आहेत. तसेच दक्षिण आफ्रिका संघाने ११ धावांची आघाडी घेतली आहे. डीन एल्गर १४० धावांवर खेळत आहे. मार्को जान्सेन ३ धावांवर नाबाद आहे.

दक्षिण आफ्रिका संघाने ६६ षटकांत ५ गडी गमावून २५६ धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याच्या हातात अजून ५ विकेट्स आहेत. आता भारताला तिसऱ्या दिवशी शक्य तितक्या लवकर दक्षिण आफ्रिकेला रोखावे लागेल आणि त्यांना पहिल्या डावात मोठी आघाडी घेण्यापासून रोखावे लागेल. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात ५० पेक्षा जास्त धावांची आघाडी घेतल्यास भारताला सामन्यात पुनरागमन करणे कठीण होईल.

केएल राहुलने झळकावले शतक –

दुसऱ्या दिवशी केएल राहुलने आपल्या वैयक्तिक धावसंख्येच्या ७० धावांच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली आणि आपले शतक पूर्ण केले. तो १०१ धावा करून बाद झाला. त्याचवेळी मोहम्मद सिराजने २२ चेंडूत पाच धावा करत राहुलला चांगली साथ दिली. प्रसिध कृष्णा नाबाद राहिला आणि भारताचा डाव २४५ धावांवर आटोपला. दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडाने पाच, नांद्रे बर्गरने दोन आणि जॅन्सेन-कोईत्झेने प्रत्येकी एक विकेट घेतली.

हेही वाचा – IND vs SA : विराट कोहलीने स्टुअर्ट ब्रॉडची ‘कॉपी’ करताच, बुमराहने भारताला मिळवून दिली विकेट, Photo होतोय व्हायरल

डीन एल्गरने सावरला दक्षिण आफ्रिकेचा डाव –

दक्षिण आफ्रिकेची सुरुवात काही खास नव्हती. एडेन मार्करम पाच धावा करून सिराजचा पहिला बळी ठरला. यानंतर एल्गर आणि टोनी डी जॉर्ज यांनी शानदार भागीदारी करत आफ्रिकेचा डाव पुढे नेला. जॉर्जी २८ धावा करून बुमराहचा बळी ठरला. पुढच्याच षटकात बुमराहनेही दोन धावांच्या स्कोअरवर पीटरसनला बाद केले. यानंतर डेव्हिड बेडिंगहॅमने ५६ धावांची खेळी खेळली आणि एल्गरसोबत उत्कृष्ट भागीदारी करत दक्षिण आफ्रिकेला सामन्यात आघाडीवर नेले. व्हर्न चार धावा करून बाद झाला. भारताकडून बुमराह-सिराजने प्रत्येकी दोन बळी घेतले. प्रसिध कृष्णाला एक विकेट मिळाली.

हेही वाचा – ODI : स्टार स्पोर्ट्सने २०२३ मधील निवडला सर्वोत्तम एकदिवसीय संघ, आठ भारतीयांसह ‘या’ तीन विदेशी खेळाडूंना दिले स्थान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पहिल्या दिवशी काय झाले?

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताची सुरुवात काही खास झाली नाही आणि कर्णधार रोहित पाच धावा करून रबाडाचा पहिला बळी ठरला. यानंतर यशस्वी जैस्वाल १७ धावा करून तंबूत परतला. तसेच शुबमन गिलही दोन धावा करून बाद झाला. २४ धावांत तीन गडी गमावल्याने भारतीय संघ अडचणीत आला होता. अशा स्थितीत श्रेयस अय्यर आणि विराट कोहली यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाला संकटातून बाहेर काढले. विराट ३८ धावा करून बाद झाला तर श्रेयस ३१ धावा करून बाद झाला. रविचंद्रन अश्विनने आठ आणि शार्दुल ठाकूरने २४ धावांचे योगदान दिले. जसप्रीत बुमराहही एक धाव काढून पॅव्हेलियनमध्ये परतला.