ENG vs IND: भारतीय संघाचा अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराह पुन्हा एकदा भारतीय संघाच्या मदतीला धावून आला आहे. बुमराहने पहिल्या डावात गोलंदाजी करताना ५ गडी बाद केले. यासह इंग्लंडचा संपूर्ण डाव ४६५ धावांवर आटोपला. भारतीय संघाने पहिल्या डावात ६ धावांची घेतली. ४७१ धावांचा डोंगर उभारल्यानंतर भारतीय गोलंदाजांवर मोठी जबाबदारी होती. मात्र, या डावात भारतीय खेळाडूंनी काही मोठ्या चुका केल्या ज्या भारतीय संघाला चांगल्याच महागात पडल्या.
या सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांनी दमदार फलंदाजी केली. सलामीला आलेल्या ओली पोपने दमदार शतकी खेळी केली. पोपने १३७ चेंडूत १०६ धावांची खेळी केली. त्याला यशस्वी जैस्वालने जीवदान दिलं. पोप ज्यावेळी ६० धावांवर फलंदाजी करत होता. त्यावेळी बुमराहच्या गोलंदाजीवर जैस्वालने सोपा झेल सोडला. जीवदान मिळताच पोपने फायदा घेत आपलं शतक पूर्ण केलं.
ओली पोपचा झेल सोडण्याआधी यशस्वी जैस्वालने बेन डकेटचा सोपा झेल सोडला. ज्यावेळी बेन डकेटचा झेल सुटला त्यावेळी तो ११ धावांवर फलंदाजी करत होता. त्यानंतर तो ६२ धावांवर बाद झाला. भारतीय संघातील सर्वात सुरक्षित क्षेत्ररक्षकांच्या यादीत रविंद्र जडेजा सर्वोच स्थानी आहे.
जडेजाकडून सहसा झेल सुटत नाहीत. मात्र या सामन्यात जडेजाने हॅरी ब्रुकचा महत्वाचा झेल सोडला. ज्यावेळी हा झेल सुटला त्यावेळी ब्रुक ४६ धावांवर फलंदाजी करत होता. त्यानंतर तो ९९ धावांवर माघारी परतला. भारतीय खेळाडूंनी या ३ चुका केल्या नसत्या, तर नक्कीच १०० ते १५० धावा वाचल्या असत्या. याचा भारतीय संघाला चांगलाच फायदा झाला असता.
इंग्लंडने केल्या ४६५ धावा
या सामन्यातील पहिल्या डावात इंग्लंडने ४६५ धावा केल्या आहेत. भारतीय संघाने ४७१ धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून फलंदाजी करताना ओली पोपने सर्वाधिक १०६ धावांची खेळी केली. तर हॅरी ब्रुकने ९९ आणि बेन डकेटने ६२ धावा केल्या. भारतीय संघाने पहिल्या डावात ६ धावांची आघाडी घेतली आहे. तर भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ५ गडी बाद केले.