वृत्तसंस्था, लंडन
विराट कोहलीने कसोटी क्रिकेटला अलविदा केले याचे मला खूप दु:ख आहे. क्रिकेटपटू म्हणून तो किती मोठा आहे, हे त्याचे आकडेच सांगतात. मात्र, आकड्यांपेक्षाही कोहलीचा कसोटी क्रिकेटवरील प्रभाव अतुलनीय आहे. कसोटीच्या उत्कर्षात त्याचे योगदान खूप मोठे आणि महत्त्वाचे आहे, अशा शब्दांत इंग्लंडचा माजी कर्णधार नासीर हुसेन याने भारताचा तारांकित फलंदाज कोहलीचे कौतुक केले.
कोहलीने काहीच दिवसांपूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आता त्याने एकदिवसीय सामने आणि ‘आयपीएल’वर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. कोहलीने १२३ कसोटी सामन्यांत ९२३० धावा केल्या. गेल्या पाच वर्षांत कोहलीला कसोटीत धावांसाठी झगडावे लागत होते. त्यामुळे एकेकाळी ५० हून अधिकची सरासरी असणाऱ्या कोहलीची कसोटी कारकीर्दीअखेरीस ४६.९० अशी सरासरी होती.
‘‘कोहली केवळ संघाला विजय मिळवून देण्यासाठीच खेळतो. धावांचा पाठलाग करताना तो इतका यशस्वी का ठरतो? कारण तो अंतिम ध्येयाचा विचार करतो आणि ते गाठण्यासाठी काहीही करायची त्याची तयारी असते. मैदानावर असताना तो आपले १०० टक्के योगदान देऊनच खेळतो. आता ते शक्य नाही असे वाटल्याने त्याने कसोटीतून निवृत्ती घेतल्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांत त्याची सरासरी खालावली. तो आणखी काही वर्षे सहज खेळू शकला असता. मात्र, त्याने स्वत:साठी एक स्तर निश्चित केला आहे आणि तो गाठणे शक्य होत नाही म्हटल्यावर कोहली निराश झाला असेल,’’ असे हुसेन म्हणाला.
‘‘गेली १४ वर्षे मी कोहलीचा मोठा चाहता आहे. क्रिकेटपटू म्हणून तो किती मोठा आहे, हे त्याचे आकडेच सांगतात. मात्र, त्यापेक्षाही कोहलीचा प्रभाव अतुलनीय आहे. त्याची देहबोली, आक्रमकता आणि मैदानावर त्याची ऊर्जा या गोष्टी त्याला इतरांपेक्षा वेगळ्या बनवतात. भारतीयांचे क्रिकेटवेड सर्वश्रूत आहे. आपल्या कर्णधाराने आपल्यासारखा उत्साह आणि ऊर्जा दाखवावी अशी त्यांची इच्छा असते. कोहलीने ते केले. त्यामुळेच तो भारतीय चाहत्यांना लाडका आहे. कर्णधार म्हणून त्याने भारतीय संघाला कसोटी क्रमवारीत अग्रस्थानी नेले आणि तब्बल ४२ महिने हे स्थान टिकवले. भारतीय संघाची खेळण्याची शैली त्याने पूर्णपणे बदलली. आता त्याचा वारसा पुढे नेणे हे अन्य खेळाडूंसमोरील मोठे आव्हान असेल,’’ असेही हुसेनने नमूद केले.
भारतीय संघाची चिंता नको – मांजरेकर
● नवी दिल्ली : सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सौरव गांगुली या ‘फॅब फोर’नंतर भारतीय क्रिकेटचे काय होणार अशी चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, पुढच्या पिढीने भारतीय क्रिकेटचा स्तर कायम राखला. आता विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या निवृत्तीनंतरही भारतीय क्रिकेट तग धरेल याची खात्री आहे, असे माजी कसोटीपटू संजय मांजरेकर म्हणाला.
● ‘‘विराट आणि रोहितच्या निवृत्तीनंतर काही चाहते चिंतेत असतील. ‘फॅब फोर’ जेव्हा ठरावीक अंतराने निवृत्त झाले त्यावेळीही अशीच चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, त्याच्या काही वर्षांनंतरच भारतीय संघ कसोटी क्रमवारीत अग्रस्थानी पोहोचला. त्यामुळे भारतात जोपर्यंत क्रिकेटचे वेड आहे, युवक हा खेळ खेळण्यासाठी उत्सुक आहेत, तोपर्यंत भारतीय क्रिकेटचा स्तर कायम राहील,’’ असे मांजरेकरने नमूद केले.
● ‘‘मोठ्या खेळाडूंची पोकळी भरण्यास वेळ लागतो. मात्र, ‘फॅब फोर’च्या निवृत्तीनंतर भारताच्या गोलंदाजीचा स्तर उंचावला. आताही याची पुनरावृत्ती होऊ शकते. नवे तारे, नवे गोलंदाज उदयास येऊ शकतील. विश्वातील अव्वल संघांमध्ये भारताचे स्थान कायम राहील याची खात्री आहे,’’ असेही मांजरेकर म्हणाला.