Anaya Bangar Big Demand From BCCI And ICC: भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांचा मुलगा आर्यन बांगरने काही महिन्यांपू्र्वी हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी केली. या शस्त्रक्रियेद्वारे आर्यनने अनाया बांगर अशी वेगळी ओळख निर्माण केली. २३ वर्षीय अनाया बांगर सोशल मीडियावर आपल्या आयुष्याबद्दल आणि आपल्या हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपीचा प्रवास सांगणारे व्हिडीओ शेअर करत असते. लिंगबदल केल्यानंतर तिने अनेक मुलाखती दिल्या. ज्यात तिने आपला प्रवास सांगितला. यादरम्यान तिने एका गोष्टीची खंत व्यक्त केली होती, ती म्हणजे क्रिकेट खेळू न शकण्याची.

अनाया बांगरने आता तृतीयपंथीयांना क्रिकेट खेळू देण्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे. तिने आयसीसी आणि बीसीसीआयकडे तृतीयपंथाना क्रिकेट खेळण्यासाठी समर्थन करण्याची विनंती केली आहे. २०२३ वनडे वर्ल्डकप स्पर्धेनंतर आयसीसीने, तृतीयपंथाना महिला क्रिकेटमध्ये खेळण्यावर बंदी घातली होती.

काय आहे अनाया बांगरची मागणी?

आर्यनची अनाया झाल्यानंतर तिने जानेवारी ते मार्च २०२५ या कालावधीत यूकेमध्ये असलेल्या मँचेस्टर मेट्रोपॉलिटन युनिव्हर्सिटी इंस्टीट्यूट ऑफ स्पोर्ट येथे झालेल्या ८ आठवड्यांच्या संशोधन शिबिरात सहभाग घेतला होता. यादरम्यान, हार्मोन थेरपीनने तिच्या हिमोग्लोबिन, स्नायूंची ताकद, सहनशक्ती, खेळातील मैदानावरील कामगिरी आणि ग्लुकोज पातळीवर कसा परिणाम केला यावर चर्चा करण्यात आली. या संशोधनात अनाया बांगरची तुलना ही सिसजेंडर म्हणजेच ज्या जन्मापासूनच महिला आहेत अशा खेळाडूंशी करण्यात आली.

या संशोधनात असं स्पष्ट झालं की, हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी केल्यानंतर अनायाची ग्लुकोजची पातळी, स्नायूंची ताकद आणि हिमोग्लोबिनची पातळी ही सिसजेंडर खेळाडूंइतकीत किंवा त्यापेक्षाही कमी आहे. त्यामुळे तिचे शरीर देखील महिलांच्या दर्जाच्या जवळ असल्याचं तिने सांगितलं आहे. तिने शेअर केलेल्या इंस्टाग्राम पोस्टला कॅप्शन देत तिने, “विज्ञान म्हणतं मी महिला क्रिकेट खेळण्यासाठी पात्र आहे, पण प्रश्न असा उपस्थित होतो की, हे जग सत्य स्विकारण्यास तयार आहे का?”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

क्रिकेटमध्ये तृतीयपंथी महिलांनाही कसं खेळता येईल, यासाठी बीसीसीआयने ठोस आणि वेज्ञानिक धोरणं बनवावीत, असं अनाया बांगरचं म्हणणं आहे. तसेच तृतीयपंथीय महिलांचा क्रिकेटमध्ये समावेश करण्यासाठी खुल्या आणि वैज्ञानिक चर्चा सुरू केल्या पाहिजेत. अनाया बांगर म्हणाली, “मला सहानुभूती नको आहे, मला तथ्य आणि सत्यावर आधारीत जग हवे आहे.” आर्यनची अनाया होण्यापूर्वी आर्यन हा प्रोफेशनल क्रिकेटपटू होता. त्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनचं प्रतिनिधित्व केलं आहे. आर्यनने भारतीय संघाकडून खेळावं, असं त्याचे वडील संजय बांगर यांचं स्वप्न होतं.