भारत आणि इंग्लंड यांच्यात अॅडलेड ओव्हलवर दुसरा उपांत्य सामना खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत आहे. नाणेफेक हरल्याने टीम इंडियाने या मैदानावर पहिला अडथळा पार केला. नशीब आज कर्णधार रोहित शर्माच्या पाठीशी असल्याचे दिसते.

वास्तविक, अॅडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या सर्व टी-२० सामन्यामध्ये, नाणेफेक जिंकणाऱ्या कर्णधाराने सामना गमावला आहे. अॅडलेड ओव्हलवर आतापर्यंत ११ टी-२० सामने खेळले गेले आहेत. यापैकी नाणेफेक जिंकणारा संघ या मैदानावर एकदाही जिंकलेला नाही. भारताने येथे दोन सामने खेळले असून दोन्ही जिंकले आहेत. त्या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय कर्णधाराने नाणेफेक गमावली. भारताने येथे दोन टी-२० सामने खेळले आहेत. २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि २०२२ मध्ये बांगलादेशविरुद्ध, दोन्हीमध्ये ही भारताने नाणेफेक गमावून सामना जिंकला होता.

२०१६ मध्ये भारताने ऑस्ट्रेलियातील या मैदानावर पहिला टी-२० सामना खेळला होता. तेव्हा भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी होता. त्याने नाणेफेक गमावली आणि भारतीय संघाने ३७ धावांनी सामना जिंकला. त्याचबरोबर या विश्वचषकात भारताने बांगलादेशविरुद्ध दुसरा सामना खेळला. या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसनने नाणेफेक जिंकून पाच धावांनी सामना गामावला.

हेही वाचा – IND vs ENG 2nd Semifinal : मोहम्मद कैफला विश्वास; म्हणाला, ‘हा’ खेळाडू भारताच्या विजयात बजावेल मह्त्वाची भूमिका

आजचा सामना जिंकून भारतीय संघाला तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी आहे. अॅडलेडमध्ये विराट कोहली चांगली फलंदाजी केली आहे. या मैदानावर त्याने ७५.५८ च्या सरासरीने ९०७ धावा केल्या आहेत. टी-२० मध्येच त्याने या मैदानावर दोन डावात १५४ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेटही १५५.५५ राहिला आहे. कोहलीने अॅडलेडमध्ये दोन डाव खेळले आहेत. यादरम्यान त्याची धावसंख्या ६४ आणि नाबाद ९० अशी राहिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.