India vs South Africa 3rd T20I Result : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील तिसरा टी ट्वेंटी सामना आज (१४ जून) विशाखापट्टणम येथील एसीए-व्हिडीसीए क्रिकेट स्टेडियमवर पार पडला. हा सामना जिंकत भारताने मालिकेतील आपले आव्हान टिकवून ठेवले आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेवर ४८ धावांनी विजय मिळवला. या मालिकेतील सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून दक्षिण आफ्रिकेने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतलेली आहे.

भारताने दिलेल्या १८० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची दमछाक झाली. युझवेंद्र चहल आणि हर्षल पटेल या फिरकीपटूंच्या जोडीसमोर आफ्रिकन फलंदाजांना तग धरता आला नाही. कर्णधार टेम्बा बावुमा (८), रीझा हेंड्रिक्स (२३), रॉसी व्हॅन डेर डुसेन (१), ड्वेन प्रिटोरियस (२०) आणि डेव्हिड मिलर (३) हे भरवशाचे फलंदाज झटपट पॅव्हेलियनमध्ये परतल्यामुळे आफ्रिकेचा संघ संकटात सापडला होता. आफ्रिकेच्यावतीने हेनरिक क्लासेनने सर्वाधिक २९ धावा केल्या. शेवटी १९.१ षटकांत आफ्रिकेचा संघ गुंडाळला गेला. युझवेंद्र चहल आणि हर्षल पटेल यांनी अनुक्रमे ३ आणि ४ गडी बाद केले. तर, भुवनेश्वर कुमार आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

त्यापूर्वी, दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराने सलग तिसऱ्यांदा नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. सुरुवातीला फलंदाजी करून भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी १८० धावांचे लक्ष्य ठेवले होते. सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि ईशान किशनच्या अर्धशतकांमुळे भारताच्या डावाला शानदार सुरुवात झाली होती. ऋतुराज गायकवाडने ५७ आणि ईशान किशनने ५४ धावा केल्या. तर, हार्दिक पंड्याने नाबाद ३१ धावा केल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना जिंकून भारताने मालिकेतील आव्हान जिवंत ठेवले आहे. सध्या पाहुण्या आफ्रिकन संघाकडे २-१ अशी आघाडी आहे. दोन्ही संघातील चौथा सामना १७ जून रोजी राजकोट येथे खेळवला जाणार आहे. तो सामनादेखील भारतीय संघासाठी ‘करो या मरो’चा असेल.