भारत आणि श्रीलंका संघांत मंगळवारी टी-२० मालिकेतील पहिला सामना पार पडला. या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताने २ धावांनी विजय मिळवला. तसेच फलंदाज शुबमन गिल आणि वेगवान गोलंदाज शिवम मावी यांनी टी-२० आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवम मावी आणि शुभमन गिल या दोन नवीन खेळाडूंना देण्यात आलेले कॅप क्रमांक. या दोघांना मिळालेल्या कॅप क्रमांकाने सर्वांच लक्ष वेधून घेतले.

राष्ट्रीय संघासाठी औपचारिकपणे कोणत्याही फॉरमॅटमध्ये पदार्पण केल्याबद्दल, प्रत्येक खेळाडूला प्रशिक्षक किंवा संघाच्या कर्णधाराकडून कॅप मिळते. शिवम मावी आणि शुभमन गिल यांच्या बाबतीतही तेच झालं. मावीला १०० क्रमांकाची तर गिलला १०१ क्रमांकाची कॅप देण्यात आली. एकाच सामन्यात एकापेक्षा जास्त खेळाडू पदार्पण करतात, तेव्हा खेळाडूंचे कॅप क्रमांक कसे ठरवले जातात, असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.

मावीला १०० आणि गिलला १०१ क्रमांकाची कॅप का मिळाली?

नियमानुसार, जेव्हा दोन किंवा अधिक खेळाडू एकाच सामन्यामध्ये पदार्पण करतात, तेव्हा कॅप क्रमांक अल्फाबेटिकलनुसार दिले जातात. याच्या आधारे शिवम मावीचे नाव अल्फाबेटिकलनुसार शुबमन गिलच्या आधी येते. अशा परिस्थितीत त्याला कॅप क्रमांक १०० मिळाला, तर शुबमन गिलचे नाव नंतर आले आणि त्याला १०१ क्रमांकाची कॅप देण्यात आली. कॅप क्रमांक कोणत्याही देशासाठी पदार्पण करणाऱ्या खेळाडूंच्या क्रमाने खेळाडूचे स्थान दर्शवतो.

१०० कॅप्स देणारा भारत ठरला दुसरा देश –

या प्रकरणात, कॅप क्रमांक १०० दर्शवितो की शिवम मावी हा टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारा १०० वा खेळाडू आहे. विशेषत: ऑस्ट्रेलियानंतर, टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० कॅप्स देणारा भारत हा दुसरा देश ठरला आहे. नवोदित शिवम मावीने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात चार विकेट घेत शानदार सुरुवात केली. मावीने चार षटकांत अवघ्या २२ धावा देत ४ विकेट्स घेत संघाच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले.

हेही वाचा – IND vs SL 1st T20: हार्दिक पांड्याने अक्षर पटेलला शेवटचे षटक का दिले? खुद्द कर्णधाराने केला खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताच्या विजयात शिवम मावीचे मोठे योगदान –

दीपक हुड्डा आणि अक्षर पटेल (२० चेंडूत नाबाद ३१) यांनी ३८ चेंडूत ६८ धावांची नाबाद भागीदारी केली. ज्यामुळे भारताला ५ बाद १६२ धावांपर्यंत पोहोचता आले. अखेरच्या षटकात श्रीलंकेला १३ धावांची गरज होती, मात्र षटकार ठोकल्यानंतरही अक्षरने चेंडूवर ताबा राखत संघाला दोन धावांनी विजय मिळवून दिला. भारतासाठी इशान किशनने २९ चेंडूत ३७ धावांची उपयुक्त खेळी खेळली. त्याचबरोबर शिवम मावीने ४ विकेट्स घेत संघाच्या विजयात मोलाचा वाट उचलला.