पीटीआय, हैदराबाद : गेल्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधल्यानंतर भारतीय संघाचे रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या आणि अखेरच्या ट्वेन्टी-२० सामन्यात विजय नोंदवत मालिका जिंकण्याचे लक्ष्य आहे. या सामन्यात हर्षल पटेल आणि यजुर्वेद्र चहल या भारताच्या दोन प्रमुख गोलंदाजांच्या कामगिरीवरही सर्वाची नजर असेल.

भारताने नागपूर येथे झालेला दुसरा ट्वेन्टी-२० सामना सहा गडी राखून जिंकला असला तरी आठ-आठ षटकांच्या झालेल्या या सामन्यात हर्षल आणि चहल यांनी निराशा केली. ट्वेन्टी-२० विश्वचषकापूर्वी या दोन्ही गोलंदाजांना लय सापडणे भारतासाठी महत्त्वाचे आहे. यासह अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारलाही सूर गवसलेला नाही. हर्षलमध्ये दुखापतीतून पुनरागमन करताना आत्मविश्वासाची कमतरता जाणवली. हर्षलला या मालिकेत एकही बळी मिळवता आलेला नाही.  दुसरीकडे,  गोलंदाजांची कामगिरी ऑस्ट्रेलियासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. पहिल्या सामन्यात फलंदाजांच्या कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने विजय नोंदवला, तर दुसऱ्या सामन्यात  गोलंदाजांना धावांचा बचाव करता आला नाही. 

  • वेळ : सायं.७ वा.  ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी