पीटीआय, गुवाहाटी

पहिल्या दोन सामन्यांतील विजयानंतर भारतीय संघाचे आज, मंगळवारी गुवाहाटी येथे होणारा तिसरा ट्वेन्टी-२० सामना जिंकून पाच सामन्यांच्या या मालिकेत विजयी आघाडी मिळवण्याचे लक्ष्य असेल. तसेच फलंदाज आपल्या कामगिरीतील सातत्य टिकवतील अशीही संघ व्यवस्थापनाला आशा असेल.सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील युवा भारतीय संघाने पहिल्या दोन्ही सामन्यांत उत्तम खेळ केला. पहिल्या सामन्यात भारताने २०९ धावांचा यशस्वी पाठलाग केला, तर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने फलंदाजीचे आमंत्रण दिल्यानंतर भारताने २३५ धावांचा डोंगर उभारला. त्यामुळे भारतीय खेळाडूंचा, विशेषत: फलंदाजांचा आत्मविश्वास उंचावलेला असेल.

भारतीय संघातील युवा फलंदाज निडरपणे आणि कोणत्याही दडपणाविना खेळताना दिसत आहेत. डावखुऱ्या इशान किशनने सलग दोन सामन्यांत अर्धशतके साकारताना भारताच्या विजयांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात मुंबईकर सलामीवीर यशस्वी जैस्वालने २५ चेंडूंत ५३ धावांची खेळी करताना भारताला आक्रमक सुरुवात करून दिली. त्याचा सलामीचा साथीदार ऋतुराज गायकवाड पहिल्या सामन्यात खातेही न उघडता धावचीत झाला होता. दुसऱ्या सामन्यात मात्र त्याने आपली गुणवत्ता सिद्ध करताना ४३ चेंडूंत ५८ धावांची खेळी साकारली. तसेच डावखुऱ्या रिंकू सिंहने पुन्हा विजयवीराची भूमिका चोख बजावताना ९ चेंडूंतच नाबाद ३१ धावा फटकावल्या. आता गुवाहाटीच्या ४० हजार आसनक्षमता असलेल्या स्टेडियमवरही चौकार-षटकारांची आतषबाजी करण्यासाठी भारतीय फलंदाज उत्सुक असतील.

हेही वाचा >>>T20 World Cup 2024 : ‘मी भारताला लवकरच…’, टीम इंडियाबद्दल रवी शास्त्रींचे मोठं वक्तव्य

दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन संघाला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी विजय अनिवार्य आहे. स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस आणि अॅडम झॅम्पा यांसारखे ऑस्ट्रेलियाचे अनुभवी खेळाडू नऊ आठवड्यांपासून भारतात आहेत. त्यामुळे या खेळाडूंमध्ये थकवा जाणवत आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाला विजय मिळवायचा झाल्यास या खेळाडूंनी कामगिरी उंचावणे गरजेचे आहे.

● वेळ : सायं. ७ वा.

● थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८-१, जिओ सिनेमा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सूर्यकुमार यादव