चोट्टोग्राम येथील मैदानात खेळवण्यात आलेल्या भारत विरुद्ध बांगलादेशदरम्यानच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये डावखुऱ्या इशान किशनने द्विशतक साजरं केलं. इशानचा विक्रमी द्विशतकी झंझावात आणि विराट कोहलीने साकालेल्या शतकाच्या बळावर भारताने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशचा २२७ धावांनी धुव्वा उडवला. मात्र, भारताने ही मालिका १-२ च्या फरकाने गमावली. मालिकेतील अंतिम सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद ४०९ अशी धावसंख्या उभारली.

किशनने सलामीला येताना १३१ चेंडूंत २४ चौकार व १० षटकारांची आतषबाजी करत २१० धावांची खेळी केली. किशनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद द्विशतकाचा (१२६ चेंडू) विक्रम आपल्या नावे केला. त्याला कोहलीची उत्तम साथ लाभली. डोंगराएवढ्या धावसंख्येचा पाठलाग करताना बांगलादेशचा संपूर्ण संघ अवघ्या १८२ धावांवर तंबूत परतला. या विजयानंतर इशान किशनने आपण ३०० धावाही केल्या असत्या असं विधान केलं आहे.

किशनने आक्रमक शैलीत फलंदाजी करताना ४९ चेंडूंत अर्धशतक, ८५ चेंडूंत शतक पूर्ण केले. मग त्याने धावांची गती अधिकच वाढवली. त्याने पुढील १०० धावा केवळ ४१ चेंडूंत केल्या. इशान किशन २१० धावांवर असताना झेलबाद झाला. इशान ३५ व्या षटकामध्ये झेलबाद झाला. मात्र आपण शेवटपर्यंत खेळलो असतो तर त्रिशतक केलं असतं असं इशानने सामन्यानंतरच्या मुलाखतीत म्हटलं. “१५ षटकांचा खेळ शिल्लक असताना मी बाद झालो नाहीतर ३०० धावा सुद्धा केल्या असत्या,” असं इशानने ‘सोनीलिव्ह’वरील समालोचकाशी संवाद साधताना म्हटलं.

नक्की पाहा >> …अन् विराट कोहली मैदानातच इशान किशन समोर करु लागला भांगडा; बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातील Video तुफान Viral

एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा किशन हा भारताचा चौथा फलंदाज ठरला. भारताचा विद्यमान कर्णधार रोहित शर्माने तीन वेळा द्विशतक झळकावलं आहे. यामध्ये रोहितची सर्वाधिक धावसंख्या २६४ इतकी आहे. याचप्रकारे सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवागनेही द्विशतक झळकावण्याचा पराक्रम केलाय. याचसंदर्भात इशानला विचारलं असता त्याने, “अशा मोठ्या खेळाडूंच्या यादीत माझं ऐकायला फार छान वाटतं,” असं उत्तर दिलं.

नक्की पाहा >> Video: याला म्हणतात किंग कोहलीचा राजेशाही थाट! खणखणीत Six ने साजरं केलं ७२ वं शतक; हा शॉट गोलंदाजही पाहतच राहिला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपल्या खेळीबद्दल सांगताना इशानने, “फलंदाजीसाठी खेळपट्टी फार उत्तम होती. मी एकच गोष्ट डोक्यात ठेऊन खेळत होतो की चेंडू फटका मारण्याजोगा असेल तर आपण फटकेबाजी करायची,” असंही सांगितलं.