India vs India A Intra Squad Match: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये येत्या २० जूनपासून पहिला कसोटी सामना रंगणार आहे. ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील हा सामना हेडिंग्लेच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्यासाठी तयारी म्हणून भारतीय खेळाडू इंट्रास्क्वॉड सामना खेळण्यासाठी मैदानात उतरले आहेत. भारतीय मुख्य संघातील खेळाडू भारतीय अ संघाविरूद्ध दोन हात करताना दिसून येत आहेत. या सामन्यात भारतीय अ संघातील खेळाडूंनी लक्षवेधी कामगिरी केली. तर संघातील प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला सराव सराव सामन्यात आपली छाप सोडता आलेली नाही.
या सामन्यातील पहिल्या दिवशी भारतीय संघातील कर्णधार शुबमन गिलने दमदार अर्धशतकी खेळी केली. तर केएल राहुलने देखील अर्धशतक झळकावत प्लेइंग ११ मध्ये आपलं स्थान जवळपास निश्चित केलं आहे. तर दुसरीकडे भारतीय अ संघातील फलंदाज सरफराज खानने दमदार शतकी खेळी केली. त्याने या डावात फलंदाजी करताना १०१ धावांची खेळी केली. या सामन्यात गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराहला एकही गडी बाद करता आलेला नाही. ही भारतीय संघासाठी चिंता वाढवणारी बाब आहे. भारतीय संघाला इंग्लंड दौऱ्यावर विजय मिळवायचा असेल, तर जसप्रीत बुमराहने विकेट्स काढणं अतिशय महत्वाचं असणार आहे.
दुसऱ्या दिवशी बुमराहचा फ्लॉप शो
सामन्यातील दुसऱ्या दिवशी गोलंदाजी करताना वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांना विकेट काढण्यात यश आलं. तर दुसरीकडे जसप्रीत बुमराहने या डावात ७ षटकं गोलंदाजी केली. यादरम्यान त्याने ३६ धावा खर्च केल्या. मात्र, त्याला एकही गडी बाद करता आला नाही. दुसऱ्या दिवशी त्याच्या गोलंदाजीत ती धार दिसून आली नाही. तो तिसऱ्या दिवशी कशी कामगिरी करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून असणार आहे. कारण, बुमराह हा भारतीय गोलंदाजी आक्रमणातील प्रमुख गोलंदाज आहे. जर त्याला विकेट मिळत नसेल, तर ही शुबमन गिल आणि भारतीय संघासाठी चिंता वाढवणारी बाब आहे.
भारतीय अ संघाने दुसऱ्या दिवसाअखेर ६ गडी बाद २९९ धावा केल्या आहेत. यादरम्यान भारतीय अ संघाकडून फलंदाजी करताना सरफराज खानने ७६ चेंडूंचा सामना करत सर्वाधिक १०१ धावा केल्या. त्याला साथ देत इशान किशनने ४५ धावांची खेळी केली. तर कर्णधार अभिमन्यू ईश्वरनने ३९ धावा केल्या. यासह साई सुदर्शनने ३९ धावा चोपल्या.