विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या बांगलादेशविरुद्ध दिवस-रात्र कसोटी सामन्यासाठी सज्ज झाला आहे. २२ नोव्हेंबरपासून कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर हा सामना रंगेल. त्याआधी २१ नोव्हेंबरला एम.एस.के. प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय निवड समिती आगामी विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड करणार आहे. प्रसाद आणि पूर्व विभागाचे प्रतिनिधी गगन खोडा यांनी आपला ४ वर्षांचा कालावधी पूर्ण केल्यामुळे गुरुवारची बैठक त्यांची अखेरची बैठक ठरु शकते. या बैठकीत वन-डे संघाचा उप-कर्णधार रोहित शर्मावर अतिक्रिकेटमुळे येणाऱ्या ताणाबद्दल चर्चा होऊ शकते.

विंडीजच्या भारत दौऱ्यात दोन्ही संघ ३ टी-२० आणि ३ वन-डे सामने खेळणार आहे. या मालिकेत रोहित शर्माला विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. नवीन वर्षात भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे या मालिकेआधी रोहितला पुरेसा आराम मिळावा यासाठी त्याला विंडीजविरुद्धच्या मालिकेत विश्रांती मिळू शकते. न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय संघ ५ टी-२०, ३ वन-डे आणि २ कसोटी सामने खेळणार आहे.

याव्यतिरीक्त भारतीय संघाचा दुसरा सलामीवीर शिखर धवन सध्या खराब फॉर्मात आहे. स्थानिक क्रिकेटमध्येही शिखरला त्याच्या लौकिकाला साजेसा खेळ करता आलेला नाहीये. त्यामुळे या मालिकेसाठी लोकेश राहुलला पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे गुरुवारच्या बैठकीत निवड समिती कोणत्या खेळाडूला संघात स्थान देते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.