विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड करताना खेळाडूंची IPL मधील कामगिरी लक्षात घेणे अयोग्य ठरेल. यापेक्षा त्यांनी मागील चार वर्षांत केलेल्या कामगिरीला अधिक महत्त्व द्यावे, अशी अपेक्षा भारताचा उपकर्णधार रोहित शर्माने याने गुरुवारी व्यक्त केली.
IPL ची अंतिम फेरी झाल्यानंतर ३० मे पासून इंग्लंडमध्ये विश्वचषकाला प्रारंभ होणार आहे. विश्वचषकासाठी भारताचा संघ अद्याप जाहीर झालेला नसून खेळाडूंच्या ‘आयपीएल’मधील कामगिरीवरही निवड समितीचे सदस्य लक्ष ठेवून आहेत. ‘‘निवड समितीचे सदस्य खेळाडूंच्या कामगिरीवर बारकाईने नजर ठेवून आहेत, याची मला जाणीव आहे. परंतु ‘आयपीएल’मधील कामगिरीच्या बळावर कोणालाही विश्वचषकात स्थान देण्यात येऊ नये, किंबहुना ते चुकीचे ठरेल, असे मला वाटते,’’ असे रोहितने ‘क्रिकेट डॉट कॉम’ या नव्या संकेतस्थळाच्या अनावरण कार्यक्रमात सांगितले.
गेल्या चार वर्षात आम्ही मुबलक प्रमाणात एकदिवसीय सामने खेळलो आहोत. त्याचसोबत टी २० सामनेदेखील खेळलो आहोत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केलेला खेळ आणि बजावलेली कामगिरी याचा अभ्यास करून टीम इंडियातील खेळाडूंची निवड करणे हे योग्य ठरेल. प्रत्येक वेळी IPL च्या नंतर एखादी मोठी स्पर्धा नियोजित असते. त्यामुळे या कामगिरीकडे लक्ष ठेवले जाते. पण त्याबरोबरच काही खेळाडूंना आरामाची गरज असते. तेदेखील लक्षात घेणे आवश्यक आहे, असेही तो म्हणाला.
‘‘निवड समितीच्या सदस्यांनी गेल्या चार वर्षांमध्ये असंख्य आंतरराष्ट्रीय सामने पाहिले असून ५० षटकांच्या स्पर्धेसाठी तुम्ही २० षटकांच्या स्पर्धेतील धावांना किंवा बळींना महत्त्व देऊ शकत नाही, असे माझे वैयक्तिक मत आहे. ‘आयपीएल’ विश्वचषकापेक्षा वेगळे आहे.’’