Hardik Pandya Emotional After Third Defeat : आयपीएल २०२४ च्या हंगामाची सुरुवात मुंबई इंडियन्ससाठी काही खास झालेली नाही. नवा कर्णधार हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली संघाने पराभवाची हॅट्ट्रिक केली आहे. घरच्या मैदानावर राजस्थानविरुद्धच्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने एक भावनिक पोस्ट शेअर लिहिली आहे. सलग दोन पराभवानंतर मुंबईचा संघ विजयाच्या आशेने घरच्या मैदानावर वानखेडेवर उतरला होता. पण राजस्थानच्या संघाने यजमान मुंबईला त्याच्या घरात पराभव केला. या पराभवाने हार्दिकच्या जखमेवर मीठ चोळले आहे. कारण रोहितच्या जागी हार्दिककडे मुंबईचे कर्णधारपद सोपवण्याचा वाद अजूनही थांबलेला नाही.

सलग तिसऱ्या पराभवानंतर हार्दिक पंड्या भावूक –

हार्दिक पंड्याने एक्स या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये लिहिले की, ‘मुंबई संघाबद्दल मी एक गोष्ट नक्की सांगू शकतो ते म्हणजे हा संघ कधीच हार मानणार नाही. आम्ही लढत राहू, संघर्ष करत राहू. जिंकण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करत राहू.’ कर्णधार हार्दिकचे लक्ष आगामी सामन्यांवर आहे. पुढचा सामना जिंकण्यासाठी ते आपली पूर्ण ताकद पणाला लावायला तयार आहेत. मुंबईचा संघ पुढील सामना ७ एप्रिलला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळणार आहे. दिल्लीचा पराभव करण्यात मुंबई टीम यशस्वी होते की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

राजस्थानविरुद्धच्या पराभवानंतर हार्दिक काय म्हणाला?

सामन्यानंतर हार्दिक पंड्याने पराभवाचे कारण सांगितले. तो म्हणाला, ‘आम्हाला पाहिजे त्या पद्धतीने सुरुवात करता आली नाही. मला वाटते की आम्ही १५० किंवा १६० पर्यंत पोहोचण्याच्या चांगल्या स्थितीत होतो, परंतु माझ्या विकेटनंतर खेळ बदलला आणि त्यांना सामन्यात चांगल्या स्थितीत आणले. मला वाटते की मी आणखी चांगली कामगिरी करू शकलो असतो.’ याआधी, मागील दोन सामन्यांमध्येही हार्दिक पंड्या गोलंदाजी आणि फलंदाजीत फ्लॉप ठरला होता.

हेही वाचा – MI vs RR : मुंबईला पराभवाच्या हॅट्ट्रिकनंतर ‘या’ गेम चेंजरची भासत आहे उणीव, माजी दिग्गज सुनील गावसकरांचे वक्तव्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिग्गजांनी हार्दिकला पाठिंबा दिला –

गेल्या काही महिन्यांपासून हार्दिकला सोशल मीडियावर किंवा स्टेडियममध्ये खूप ट्रोल केले जात आहे. मुंबईच्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस हार्दिकवर नाराजी व्यक्त करताना दिसत आहे. मात्र वानखेडेमध्ये दिग्गज खेळाडूंनी हार्दिकला पाठिंबा देत चाहत्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. रोहितने हार्दिकला ट्रोल करणाऱ्या चाहत्यांना शांत केले. त्याचवेळी नवज्योतसिंग सिद्धू आणि हरभजन सिंगही त्याला साथ देताना दिसले.