Mumbai Indians Scenario To Enter In IPL 2025 Playoffs: मुंबई इंडियन्स हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. मुंबईने आतापर्यंत पाच वेळेस आयपीएलची ट्रॉफी उंचावली आहे. मात्र, यावेळी मुंबईला हवी तशी सुरुवात करता आलेली नाही. नेहमी टॉप पाचमध्ये असणारा संघ यावर्षी संघर्ष करताना दिसतोय. गुरुवारी (१७ एप्रिल) सनरायझर्स हैदराबादला पराभूत केल्यानंतर पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सचा प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, इथून पुढे मुंबईसाठी प्लेऑफमध्ये जाण्याचं समीकरण कसं असेल? जाणून घ्या. (IPL 2025 Playoffs)
नेहमीप्रमाणे यावर्षीही मुंबईने पराभवापासून स्पर्धेची सुरुवात केली. या हंगामातील पहिल्या सामन्यात मुंबईला चेन्नईकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर पुढील सामन्यात लखनऊने मुंबईला पराभूत केलं. सुरुवातीचे दोन सामने गमावल्यानंतर मुंबईला तिसऱ्या सामन्यात सूर गवसला. मुंबईने कोलकाता नाईट रायडर्सवर ८ गडी राखून विजय मिळवला. त्यानंतर मुंबईला लखनऊ सुपरजायटंस् आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला. अखेर मुंबईने दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबादला पराभूत करून दणक्यात कमबॅक केलं आहे.
कसं असेल मुंबईसाठी प्लेऑफमध्ये जाण्याचं समीकरण?
मुंबई इंडियन्सची या हंगामातील कामगिरी पाहिली तर हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघाने आतापर्यंत ७ सामने खेळले आहेत. यादरम्यान मुंबईला ३ सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे, तर ४ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुंबईचा नेट रनरेट +०.२३९ इतका आहे. एकूण ६ गुणांसह मुंबईचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानी आहे.
मुंबई इंडियन्ससाठी प्लेऑफ गाठणं तसं कठीण काम नाही, कारण प्लेऑफमध्ये जाणारा चौथा संघ जर १६ गुणांसह प्लेऑफसाठी पात्र ठरणार असेल, तर मुंबईला पुढील ७ पैकी ५ सामने जिंकावे लागतील. सध्या मुंबईचे ६ गुण आहेत, त्यामुळे जर पुढील ७ पैकी ५ सामने जिंकले, तर मुंबईचा संघ १६ गुणांपर्यंत सहज पोहोचू शकतो. ७ पैकी ७ जिकंले, तर उत्तमच असेल. मात्र, आपलं स्थान निश्चित करण्यासाठी किमान ५ सामने जिंकणं गरजेचं असणार आहे. मुंबईने यापूर्वीही अनेकदा शेवटचे सामने जिंकून प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे आणि स्पर्धाही जिंकल्या आहेत, त्यामुळे या हंगामातही मुंबईची जादू चालणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.