आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला सुरुवात होऊ दोन आठवडे झाले आहेत. या हंगामातील सर्वच सामने रोमहर्षक होत असून वेगवेगळ्यां संघाची विजयी घोडदौड सुरु आहे. असे असले तरी दुसरीकडे मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघांनी आतापर्यंतचे सर्वच सामने गमावले आहेत. एकाही सामन्यात विजय प्राप्त करता न आल्यामुळे चेन्नई संघ गुणतालिकेत सर्वात शेवटच्या स्थानावर आहे. दरम्यान, चेन्नईची अशी दुर्दशा झालेली असताना भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी चेन्नई सुपरकिंग्जची कामगिरी आणि चेन्नईच्या कर्णधारपदावर मोठं भाष्य केलंय. त्यांनी रविंद्र जाडेच्या जागेवर दुसरा खेळाडू कर्णधार असायला हवा होता, असं म्हटलंय.

हेही वाचा >>>> IPL 2022, RR vs LSG : हेटमायर नावाच्या वादळापुढे लखनऊची दाणादाण, अखेरच्या षटकात धावांचा पाऊस

शनिवारी सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई या दोन संघांमध्ये सामना झाला. मात्र या सामन्यात चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला. या हंगामातील चेन्नईचा हा चौथा पराभव आहे. रवी शास्त्री यांनी संघाच्या खराब कामगिरीवर भाष्य केलंय. चेन्नईचा कर्णधार रविंद्र जाडेजा नव्हे तर फाफ डू प्लेसिस असायला हवा होता, असं शास्त्री यांनी म्हटलंय. तसेच जाडेजाने आपल्या खेळाकडे लक्ष केंद्रित करणं गरजेचं असल्याचं मत रवी शास्त्री यांनी व्यक्त केलंय.

हेही वाचा >>>> आयपीएलमध्ये पंचांकडून चुकांवर चुका, DC vs KKR सामन्यात खेळाडू वैतागले, नेमकं काय घडलं?

“रविंद्र जाडेजासारख्या खेळाडूने खेळावर लक्ष केंद्रित करावं असं मला वाटतं. चेन्नईने फाफ डू प्लेसिसला जाऊ द्यायला नको होते. फाफ हा सामन्याला कलाटणी देणार फलंदाज आहे. धोनीला कर्णधारपद नको होते तर त्याऐवजी फाफ डू प्लेसिसकडे ही जबाबदारी सोपवायला हवी होती. जाडेजाने एक खेळाडू म्हणून सामन्यात सहभागी व्हायला हवं होतं. कर्णधारपद नसल्यामुळे तो मुक्तपणे खेळू शकला असता. कर्णधार नसल्यामुळे जाडेजावर दबाव नसता,” असं ईएसपीए क्रिक इन्फोशी बोलताना रवी शास्त्री यांनी म्हटलंय.

हेही वाचा >>>> केकेआरच्या गोलंदाजांनी हात टेकले, पॉवरफुल वॉर्नरची तुफान फटकेबाजी, अर्धशतक झळकावून रचला ‘हा’ नवा विक्रम

दरम्यान, या हंगामच्या सुरुवातीलाच महेंद्रसिंह धोनीने कर्णधारपदाचा त्याग करत चेन्नईची जबाबदारी रविंद्र जाडेजाकडे सोपवली. या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज आतापर्यंत एकही सामना जिंकू शकलेला नाही. चेन्नईने आतापर्यंत सलग चार सामने गमावले आहेत.