आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सर्वच सामने अटीतटीचे होत आहेत. शनिवारी पार पडलेल्या बंगळुरु आणि मुंबईमधील सामना तर चांगलाच रोमहर्षक ठऱला. या सामन्यात बंगळुरुने सात गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर बंगळुरु गुणतालिकेत थेट तिसऱ्या क्रमांकावर जाऊन पहोचला आहे. दरम्यान, या सामन्यातील विराट कोहलीची विकेट आणि पंचांचा निर्णय यावर चांगलीच चर्चा रंगली आहे. पंचाने विराट कोहलीला चुकीच्या पद्धतीने बाद केल्याचा आरोप बंगळुरुचे चाहते करत आहेत. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने तर थेट नियमावर बोट ठेवले आहे.

मुंबईविरुद्धच्या सामन्यात नेमकं काय घडलं ?

मुंबईने बंगळुरुला १५२ धावांचे लक्ष्य दिले. हे लक्ष्य गाठताना बंगळुरु संघ पहिल्यापासूनच आक्रमक पद्धतीने खेळत होता. सलामीला आलेल्या फाफ डू प्लेलिस आणि अनुज रावत यांनी ५० धावांची भागिदारी केली. फाफ १६ धावांवर बाद झाल्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी विराट कोहली फलंदाजीसाठी आला. कोहलीनेदेखील मुंबईच्या गोलंदाजांना घाम फोडत तुफान फटकेबाजी केली. त्याने ५ चौकार यांच्या मदतीने ३६ चेंडूंमध्ये ४८ धावा केल्या. देवाल्ड ब्रेविसच्या चेंडूचा सामना करताना त्याला पायचित म्हणून बाद जाहीर करण्यात आलं. मात्र त्याला चुकीच्या पद्धतीने बाद दिल्याचं म्हटलं जातंय. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने तर थेट नियम दाखवत पंचांच्या निर्णयावर आक्षेप व्यक्त केलाय.

आरसीबीने कोणता नियम सांगितला ?

आरसीबीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पायचित जाहीर करण्याबाबतचा नियम काय असतो हे सांगितले आहे. जर बॅट आणि पायाला चेंडू सोबत लागलेला असेल तर चेंडू अगोदर बॅटला लागल्याचे गृहीत धरावे, असे नियमामध्ये सांगितलेले आहे, असे आरसीबीने म्हटलंय. या नियमाला गृहित धरले तर विराट कोहलीला बाद कसं जाहीर केलं ? असं विचारलं जातंय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, दुसऱ्या विकेटसाठी आलेल्या विराटने ३६ चेंडूंमध्ये पाच चौकार यांच्या मदतीने ४८ धावा केल्या. तर अनुज रावतने ४७ चेंडूंमध्ये दोन चौकार आणि सहा षटकार यांच्या मदतीने ६६ धावा केल्या. दोघांच्या या खेळीमुळे बंगळुरुचा विजय सोपा झाला.