IPL 2024, Rishabh Pant: भारताचा विस्फोटक फलंदाज आणि विकेटकिपर ऋषभ पंतला पुनरागमन करताना पाहण्यासाठी सर्वच जण उत्सुक झाले आहेत. इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या १७ व्या सीझनमध्ये पंत दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीचे नेतृत्व करणार आहे. पंतला शेवटचा क्रिकेट सामना खेळून १५ महिने झाले आहेत, त्यामुळे त्याच्या पुनरागमनावर सर्वांच्या नजरा आहेत. ऋषभच्या नेतृत्त्वाखाली दिल्लीचा संघ आयपीएल २०२४चा पहिला सामना पंजाब किंग्सविरूध्द खेळणार आहे. याच पार्श्वभूमीवर ऋषभ पंतचा अपघातापूर्वीचा शेवटचा सामना कसा होता, याचा आढावा घेऊया.

अपघातापूर्वीचा पंतचा शेवटचा आयपीएल सामन्यात काय घडलेलं?

२१ मे २०२२ रोजी पंत शेवटचा आयपीएल सामना खेळला होता. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेलेला हा स्पर्धेतील ६९वा सामना होता. पंत हा दिल्लीचा कर्णधार होता पण त्याला या अखेरच्या सामन्यातील आठवणी नक्कीच नकोशा असतील कारण या सामन्यात संघाचा दारूण पराभव झाला होता.

दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ बाद १५९ धावा केल्या, रोव्हमन पॉवेलने संघासाठी सर्वाधिक धावा केल्या. मुंबई इंडियन्सकडून इशान किशनने ३५ चेंडूत४८ धावा केल्या. शेवटी, दिल्ली कॅपिटल्सने हा सामना ५ चेंडू आणि पाच विकेट्सने गमावला.

पंतची शेवटच्या आयपीएल सामन्यातील कामगिरी कशी होती?

पंत हा त्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा दुसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. डावखुऱ्या फलंदाजाने ३३ चेंडूत चार चेंडू आणि एका षटकाराच्या मदतीने ३९ धावा केल्या. रमणदीप सिंगच्या गोलंदाजीवर इशान किशनकडून झेलबाद झाला होता. त्याने या सामन्यात यष्टिरक्षक म्हणून पंतने एक झेल घेतला. पंतसाठी हा अखेरचा आयपीएल सामना कर्णधार म्हणून खूपच वाईट गेला. या सामन्यात त्याच्याकडून अनेक चुकाही घडल्या. त्याने एक मोठा झेल सोडला आणि महत्त्वाचा रिव्ह्यू न घेण्याचा निर्णय संघासाठी खूपच नुकसान होणारा ठरला. या पराभवासह दिल्लीचं स्पर्धेतीलं आव्हान संपुष्टात आलं.

या सामन्यातील पराभवाचे एक कारण ठरले ते म्हणजे पंतने रिव्ह्यू घेण्यास दिलेला नकार. दुसऱ्या डावाच्या १५व्या षटकात ठाकूर गोलंदाजी करत होता, त्याने तिसऱ्या चेंडूवर डेवाल्ड ब्रेविसला बाद केले. तर चौथ्या चेंडूवर विस्फोटक फलंदाज टीम डेव्हिडही झेलबाद होता तशी अपीलही झाली, पण मैदानातील पंचांनी त्याला नाबाद दिले. पंतने त्याच्या गोलंदाजासोबत बराच वेळ चर्चा केली आणि २ रिव्ह्यू शिल्लक असतानाही त्याने रिव्ह्यू घेतला नाही.

पुढील चेंडू टाकण्यापूर्वी रिप्लेमध्ये टीम डेव्हिड बाद असल्याचे समजले. अल्ट्राऐजमध्ये चेंडूने त्याची बॅटची कड घेतल्याने तो बाद असल्याचे दिसताच पंतही वैतागला. हे जीवदान मिळाल्यानंतर टीम डेव्हिडने आपली तुफान फटकेबाजी सुरू केली. तेव्हा मुंबई संघाला ३३ चेंडूत ६६ धावांची गरज होती. त्यानंतर बाद होण्यापूर्वी डेव्हिडने ११ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांसह ३४ धावा कुटल्या आणि दिल्लीला पराभूत करण्यात मोठी भूमिका बजावली.

एकंदरीत, पंतने आयपीएल २०२२ मध्ये १४ सामन्यांत १५१.७८ च्या स्ट्राइक रेटने ३४० धावा केल्या. या स्फोटक फलंदाजाला २०२२ च्या मोहिमेत एकही अर्धशतक झळकावता आले नाही.