Mohammed Siraj Press Conference : भारत आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने त्याला मिळालेल्या यशाबद्दल खुलासा करत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. कोविडमुळं लॉकडाऊनमध्ये केलेल्या प्रचंड मेहनीचं हे फळ असल्याचं सिराजनं म्हटलं आहे. गुरुवारी पंजाब किंग्जविरोधात झालेल्या सामन्यात सिराजने चार विकेट्स घेतल्याने आरसीबीचा २४ धावांनी विजय झाला. भारतासाठी सिराज आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमध्ये प्रभावशाली गोलंदाजांपैकी एक बनला आहे. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थित सिराजने चांगल्या प्रकारे जबाबदारी सांभाळली आहे. वनडे फॉर्मेटमध्ये सिराजने यावर्षाच्या सुरुवातीला गोलंदाजीत अव्वल स्थान गाठले होते.

सामना संपल्यानंतर सिराज म्हणाला, लॉकडाऊन माझ्यासाठी खूप महत्वपूर्ण होता. मी याआधी खूप निराश होतो. कारण मी यापूर्वी खूप महागडा ठरलो होतो. मी जिम प्रशिक्षण आणि माझ्या गोलंदाजीवर लक्ष केंद्रीत केलं आणि मला चांगलं प्रदर्शन करायचं होतं. एकदिवसीय सामन्यांतही माझी लय चांगली होती. माझा आत्मविश्वास वाढला होता आणि आयपीएलच्या या हंगामात मी त्याच आत्मविश्वासाने खेळत आहे. मी एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. मी कधी कधी काही चूका करतो. मी प्रत्येक गोष्टीत सुधारणा आणण्याचा प्रयत्न करतो. ज्यामुळे मला संघात योगदान देता येईल.

नक्की वाचा – WTC ‘टीम ऑफ द टूर्नामेंट’ची घोषणा; ऋषभ पंतसह तीन भारतीय खेळाडूंचा समावेश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरसीबीचा कर्णधार विराट कोहली म्हणाला, “पीसीए आयएस बिंद्रा स्टेडियमच्या खेळपट्टीवर फलंदाजी करणं आव्हानात्मक होतं. आम्ही अशाच प्रकारे खेळत राहू. पाच-सहा सामने खेळल्यानंतर तुमच्या खेळाचा अंदाज घेता येत नाही. पहिल्या इनिंगमध्ये परिस्थितीत बदलत राहिली. फाफ डु प्लेसिसने चांगली फलंदाजी केली. आम्ही भागिदारी वाढवण्याचा खूप प्रयत्न केला. तरीही आम्ही अजून अतिरिक्त २० धावांची भागिदारी करु शकलो नाही. सात-आठ षटकानंतर चेंडू धीम्या गतीनं येत होता त्यामुळे आम्हाला आमची रणनिती बदलावी लागली.”