Sunil Gavaskar Special Request To BCCI: एक आठवड्यासाठी स्थगित करण्यात आलेली आयपीएल २०२५ स्पर्धा पुन्हा एकदा सुरू होणार आहे. स्पर्धेतील उर्वरीत सामने १७ मेपासून सुरू होणार आहे. पुन्हा एकदा चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळणार आहे. दरम्यान स्पर्धेला सुरूवात होण्यापूर्वी भारताचे माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक सुनील गावसकर यांनी बीसीसीआयकडे खास विनंती केली आहे.
गेल्या काही दिवसांत खूप काही घडलं आहे. २२ एप्रिलला पाकिस्तानच्या दहशतवाद्यांकडून पहलगाममध्ये हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात निष्पाप भारतीयांना आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि पाकिस्तानला चांगलंच प्रत्युत्तर दिलं. दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातावरण आहे. याच कारणास्तव ही स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. आता दोन्ही देशातील तणाव कमी झाल्यानंतर ही स्पर्धा पुन्हा एकदा सुरू होत आहे. मात्र, यावेळी चीअर लीडर्स, डान्स, गाणं काहीच नको अशी विनंती सुनील गावसकरांनी बीसीसीआयकडे केली आहे.
भारत- पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये झालेल्या संघर्षात सैन्यातील जवानांसह निष्पाप भारतीयांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे आयपीएल स्पर्धा शांत वातावरणात खेळवण्यात यावी असं सुनील गावसकरांचं म्हणणं आहे.
स्पोर्ट्स टूडेला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सुनील गावसकर म्हणाले, ” आतापर्यंत जवळपास ६० सामने पूर्ण झाले आहेत. शेवटचे १५-१६ सामने शिल्लक आहेत. आता मला मनापासून वाटतंय की डीजे नको, षटक संपल्यानंतर धिंगाणा नको. काही कुटुंबांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलं आहे. सामने व्हायला हवेत, प्रेक्षक मैदानात यायला हवे पण नाचणाऱ्या मुली नको. फक्त क्रिकेट खेळा.”
पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना रद्द केल्यानंतर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ही स्पर्धा एक आठवड्यासाठी स्थगित करण्यात आल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. बीसीसीआयने १२ मे ला नवीन वेळापत्रक जाहीर केलं आहे.
या नव्या वेळापत्रकानुसार, स्पर्धेतील उर्वरीत सामन्यांना १७ मेपासून सुरूवात होणार आहे. तर स्पर्धेतील अंतिम सामना ३ जून रोजी खेळवला जाणार आहे. आतापर्यंत या स्पर्धेतील ५८ सामने पूर्ण झाले आहेत. तर अजूनही १६ सामने शिल्लक आहेत. हे सामने ६ शहरात खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेतील प्लेऑफ आणि अंतिम सामना कुठे होणार, हे अजूनपर्यंत ठरलेलं नाही. माध्यमातील वृत्तानुसार स्पर्धेतील अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाऊ शकतो.