आयपीएलचं पहिलंवहिलं जेतेपद पटकावण्यासाठी पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. दोन्ही संघ आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून खेळत आहेत मात्र जेतेपदाने त्यांना हुलकावणी दिली आहे. या खेपेस मात्र दोन्ही संघांपैकी एकाचं जेतेपदाचं स्वप्न प्रत्यक्षात साकारणार आहे. योगायोग म्हणजे पंजाब आणि बंगळुरू दोन्ही संघांची यंदाच्या हंगामातली कामगिरी सारखीच आहे. दोन्ही संघांनी १४ लढतींपैकी ९ मध्ये विजय मिळवला असून, ४ सामन्यात पराभवाचा सामना केला आहे. दोन्ही संघांचा एकेक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. दोन्ही संघांचे प्राथमिक फेरीअखेर प्रत्येकी १९ गुण झाले. बाद फेरीच्या पहिल्या सामन्यात आरसीबीने पंजाबचा धुव्वा उडवला. क्वालिफायर२च्या लढतीत पंजाबने बलाढ्य मुंबईला नमवत अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम लढतीत पुन्हा एकदा त्यांच्यासमोर आरसीबीचं आव्हान असणार आहे. प्राथमिक फेरीत एकमेकांविरूद्धच्या लढतीत पंजाबने एक आणि बंगळुरूने एक मुकाबला जिंकला आहे. जेतेपदांच्या बाबतीत दोन्ही संघांची पाटी कोरी आहे.

आक्रमण

पॉवरप्लेच्या ६ षटकांमध्ये जोरदार आक्रमण ही पंजाबची ताकद आहे. दर्जेदार गोलंदाजांना तसंच चांगल्या चेंडूवरही चौकार, षटकार वसूल करण्यात पंजाबचे फलंदाज यशस्वी ठरले आहेत. प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्य या जोडीने पॉवरप्लेच्या सहा षटकांचा पुरेपूर फायदा उठवला आहे. कर्णधार श्रेयस अय्यरने आपल्या आक्रमक खेळाचा क्वालिफायर२च्या लढतीत सादर केला. अपारंपरिक पद्धतीने फटकेबाजी करणारा जोश इंगलिस पंजाबच्या ताफ्यात आहे. जसप्रीत बुमराहसारख्या अत्यंत चतुर गोलंदाजाविरुद्ध इंगलिसने धावा वसूल केल्या. पदलालित्याचा वापर करणाऱ्या इंगलिसला रोखणं ही प्रतिस्पर्ध्यांसाठी डोकेदुखी असणार आहे. मुंबई इंडियन्सकडून पंजाबकडे आलेल्या नेहल वढेराने प्रसंगानुरुप खेळून सगळ्यांनाच प्रभावित केलं आहे. मार्कस स्टॉइनस आणि शशांक सिंग यांनी फिनिशरची भूमिका चोख निभावली आहे.

अर्शदीप-चहलवर भिस्त

टी२० प्रकारात प्रत्येक संघ जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करतो. तसं होऊ द्यायचं नसेल तर गोलंदाजांनी सातत्याने विकेट्स पटकावणं आणि शिस्तबद्ध गोलंदाजी करून धावा रोखणं आवश्यक आहे. लिलावात पंजाबने विचारपूर्वक डावपेच आखत गोलंदाज ताफ्यात समाविष्ट केलं. डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग, अनुभवी फिरकीपटू युझवेंद्र चहल ही पंजाबची ताकद आहे. राष्ट्रीय कर्तव्यासाठी रवाना झाल्यामुळे मार्को यान्सन मायदेशी परतला आहे. त्याच्या अनुपस्थितीत कायले जेमिसनला संघात संधी मिळाली आहे. सहा फुटांपेक्षा जास्त उंची असलेला जेमिसन अतिशय हुशार गोलंदाज आहे. फलंदाजांसाठी सापळे रचून त्यांना बाद करणं ही त्याची हातोटी आहे.

श्रेयस अय्यरचं नेतृत्व

टी२० प्रकारात कर्णधार हा सगळ्यात निर्णायक ठरतो. क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीत बदल करणं, प्रतिस्पर्धी फलंदाजांचा अभ्यास करून गोलंदाजांना सल्ले देणे, पाऊस-वारा या भौगोलिक घटकांसह डकवर्थ लुईस, खेळाचे नियम यांचा पुरेपूर अभ्यास असणं आवश्यक ठरतं. श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वात तिसऱ्या संघाने आयपीएलची अंतिम फेरी गाठली आहे. दिल्लीला पराभवाचा सामना करावा लागला होता मात्र श्रेयसने कोलकाताला जेतेपद मिळवून दिलं होतं. यंदाही श्रेयस आणि त्याचा संघ जेतेपदापासून एक पाऊल दूर आहे.

दुसरी फळी कमकुवत

विजयकुमार व्यशक, ओमरझाई आणि मार्कस स्टॉइनस हे पंजाबचं दुसऱ्या फळीचं आक्रमण कमकुवत भासतं. स्टॉइनस दुखापतीमुळे गोलंदाजी करतोच असं नाही. ओमरझाईकडे अनुभवाची कमतरता आहे. डोमेस्टिक क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव व्यशककडे आहे मात्र आयपीएल फायनलच्या अंतिम लढतीचं दडपण हाताळणं त्याच्यासाठी मोठं आव्हान आहे. हरप्रीत ब्रारने स्पर्धेत चांगली गोलंदाजी केली मात्र बंगळुरुचे फलंदाज त्याला लक्ष्य करू शकतात.

क्वालिफायर१च्या लढतीत पंजाबचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला होता. अनुभवी तंत्रशुद्ध फलंदाजाची उणीव पंजाबला भासू शकते. श्रेयस अय्यरवर त्यामुळे अतिरिक्त दडपण असेल.

किंग कोहली

धावांचा पाठलाग करताना कसं खेळावं याचं चपखल उदाहरण म्हणजे विराट कोहली. कोणत्या गोलंदाजावर आक्रमण करायचं, कोणाला सन्मान द्यायचा, कधी चौकार-षटकार लगावायचे याचं प्रारुप कोहलीने तयार केलं आहे. कोहली खेळता खेळता कधी गिअर बदलतो समजतही नाही इतका तो या गोष्टीत वाकबगार आहे. मोठी धावसंख्या रचून निर्धास्त होणं श्रेयस अय्यरच्या संघाला परवडू शकत नाही कारण आरसीबीकडे कोहली आहे. आपल्या स्वत:च्या बरोबरीने बाकीच्यांना साथ देणं, भागीदाऱ्या रचणं यातही कोहली आघाडीवर असतो.

गोलंदाजी चमू

जोश हेझलवूड, भुवनेश्वर कुमार, यश दयाळ, कृणाल पंड्या आणि सुयश शर्मा या पाचजणांनी आरसीबी संघाला ताकद मिळवून दिली आहे. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणं यासाठी हेझलवूड ओळखला जातो. त्याच्या चेंडूवर मोठे फटके खेळणं आत्मघातकी ठरू शकतं. भुवनेश्वर कुमारचा अनुभव आरसीबीसाठी अत्यंत निर्णायक ठरू शकतो. यश दयाळने मोक्याच्या क्षणी भागीदारी तोडून विकेट्स पटकावल्या आहेत. सुयश शर्मा हा आरसीबीचा हुकमी एक्का झाला आहे. कृणाल पंड्याने शिस्तबद्ध गोलंदाजी करत फलंदाजांना जखडून ठेवलं आहे.

स्फोटक चौकडी

टीम डेव्हिड, फिल सॉल्ट, रोमारिओ शेफर्ड आणि जितेश शर्मा या चौघांनी सातत्याने तडाखेबंद खेळी साकारल्या आहेत. फिनिशरची भूमिका त्यांनी यथार्थपणे निभावली आहे. अंतिम लढतीत यांच्यापैकी एकाला सूर गवसल्यास पंजाबच्या अडचणीत भर पडू शकते.

दुखापती आणि वैयक्तिक कारण

मुलाच्या जन्मावेळी उपस्थित राहायचं असल्यामुळे फिल सॉल्ट अंतिम लढतीत कदाचित खेळणार नाही. बंगळुरू संघव्यवस्थापनाने यासंदर्भात माहिती दिलेली नाही. सॉल्ट आरसीबीच्या सरावावेळी उपस्थित नव्हता. विराट कोहली-फिल सॉल्ट ही आरसीबीसाठी बिनीची जोडी ठरली आहे. सॉल्ट खेळू न शकल्यास बंगळुरूला डावपेचात बदल करावे लागतील. यामुळे मधल्या फळीवर दडपण येऊ शकतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अहमदाबादचं मैदान मोठं आहे. इथे षटकार खेचणं हे आव्हान आहे. रोमारिओ शेफर्ड, जितेश शर्मा, टीम डेव्हिड यांच्यासाठी हा महत्त्वाचा मुद्दा आहे. दुखापतीमुळे टीम डेव्हिड क्वालिफायर१च्या लढतीत खेळू शकला नव्हता. डेव्हिड उपलब्ध नसेल तर बंगळुरूची भिस्त लायम लिव्हिंगस्टोनवर आहे. त्याला यंदा लौकिकाला साजेसा खेळ करता आलेला नाही.