Shashi Tharoor’s response to Harbhajan Singh tweet : आयपीएल २०२४ हंगामानंतर जूनमध्ये आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा १ ते २९ जून दरम्यान वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत आयोजित केली जाणार आहे. यावेळी भारतीय संघ आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याच्या निर्धाराने स्पर्धेत सहभागी होईल. तत्पूर्वी फिरकीपटू हरभजन सिंग म्हणाला, संजू सॅमसनने भारतीय टी-२० संघात थेट निर्माण केले आहे. त्यामुळे सॅमसनला उपकर्णधार बनवावे आणि रोहित शर्मानंतर टी-२० मध्ये कर्णधारपदासाठी तयार करावे. हरभजन सिंगच्या या वक्तव्यावर काँग्रेस नेते शशी थरुर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या मते संघ निवडीच्या वेळी संजू सॅमसनच्या नावाचा विचार केला जात नाही.

हरभजन सिंग संजू सॅमसनबद्दल काय म्हणाला होता?

मुंबई इंडियन्सविरुद्ध राजस्थान रॉयल्सच्या मोठ्या विजयानंतर हरभजन सिंगने एक्सवर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये लिहले, “यशस्वी जैस्वालची खेळी हा पुरावा आहे की त्याचा ‘क्लास परमनंट’ असून ‘फॉर्म टेम्पररी’ आहे. यशस्वी आणि यष्टीरक्षक फलंदाजाबद्दल कोणताही वाद नसावा. संजू सॅमसनने टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात यावे आणि रोहित शर्मानंतर पुढील टी-२० संघाचा कर्णधार म्हणूनही त्याला तयार केले जावे. याबद्दल कोणाला काही शंका आहे का?”

प्रतिभावान खेळाडू संजू सॅमसनच्या समर्थनार्थ शशी थरूर पुढे येण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०२३ मध्ये, थरूर यांनी एकदिवसीय विश्वचषकासाठी संजूची निवड न केल्याने निवडकर्त्यांकडून स्पष्टीकरण मागितले होते. बुधवार, २४ एप्रिल रोजी, थरूर यांनी हरभजन सिंगच्या ट्विटवर प्रतिक्रिया दिली, जिथे माजी भारतीय क्रिकेटपटूने टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये स्थान मिळवण्यासाठी सॅमसनला पाठिंबा दिला आहे.

हेही वाचा – CSK vs LSG : लखनऊ सुपर जायंट्सच्या विजयानंतर ‘तो’ चाहता रातोरात झाला प्रसिद्ध, सोशल मीडियावर VIDEO व्हायरल

हरभजनच्या ट्विटला प्रत्युत्तर देताना थरुर काय म्हणाले?

काँग्रेस नेते शशी थरुर हरभजन सिंगच्या ट्विटला प्रत्युत्तर देताना म्हणाले, “यशस्वी जैस्वाल आणि संजू सॅमसन या दोघांबद्दल माझे सहकारी खासदार हरभजन सिंग सहमत झाल्यामुळे आनंद झाला! अनेक वर्षांपासून असा तर्क लावलला जात आहे की, संजूला तो पात्र असताना देखील त्याची अनेक वेळा निवड करण्यात आली नाही. त्यामुळे त्याला भारतीय संघात आपले कौशल्य दाखवण्याची पूरेपूर संधी मिळालीच नाही. सध्या सुरु असलेल्या आयपीएल २०२४ मध्ये ही तो आघाडीचा यष्टीरक्षक-फलंदाज आहे. पण अजूनही संघ निवडीवर चर्चा होताना संजूच्या नावाचा विचार केला जात नाही. त्यामुळे संजू सॅमसनला न्याय मिळाला पाहिजे.”