Shreyas Iyer Statement On Defeat, IPL 2025 Final: आयपीएल २०२५ स्पर्धेत पंजाब किंग्ज संघाने दमदार खेळ केला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाने पहिल्या सामन्यापासून चॅम्पियनसारखा खेळ केला. साखळी फेरीतील कामगिरी पाहता या संघाला पहिल्या जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते.मात्र, अंतिम फेरीत या संघाला नशिबाची साथ मिळाली नाही. त्यामुळे पंजाब किंग्ज संघाचं पहिलं जेतेपद जिंकण्याचं स्वप्न थोडक्यात हुकलं.
या सामन्यात पंजाब किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला २० षटकांअखेर १९० धावा करता आल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून विराट कोहलीने सर्वाधिक ४३ धावांची खेळी केली. तर फिल सॉल्टने १६, मयांक अग्रवालने २४, रजत पाटीदारने २६, लियाम लिव्हिंगस्टोनने २४ आणि जितेश शर्मा २४ धावांची खेळी केली.
पंजाब किंग्जला आयपीएल २०२५ स्पर्धेची ट्रॉफी जिंकण्यासाठी १९१ धावांचा डोंगर सर करायचा होता. या धावांचा पाठलाग करताना पंजाबची भक्कम बॅटिंग लाईनअप कोसळली. पंजाबकडून सलामीला आलेल्या प्रियांश आर्यने २४, प्रभसिमरन सिंगने २६, जॉश इंग्लिशने ३१ धावांची खेळी केली. शेवटी शशांक सिंगने मोठे फटके मारले. पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. त्याने ३० चेंडूत ३ चौकार आणि ६ षटकारांच्या साहाय्याने नाबाद ६१ धावांची खेळी केली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून गोलंदाजी करताना कृणाल पांड्याने ४ षटकांत १७ अवघ्या १७ धावा खर्च करत २ गडी बाद केले. या कामगिरीच्या बळावर त्याची अंतिम सामन्यातील सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.
पराभवानंतर काय म्हणाला श्रेयस अय्यर?
आपल्या पहिल्या ट्रॉफीपासून अवघ्या ६ धावा दूर राहिल्यानंतर श्रेयस अय्यर म्हणाला, ” आमचा इथपर्यंतचा प्रवास अविश्वसनीय होता. मी आमच्या सपोर्ट स्टाफचे मनापासून आभार मानतो. गेल्या सामन्यात आम्ही मुंबई इंडियन्सला ज्याप्रकारे हरवलं, ते पाहता या मैदानावर २०० धावांचा पाठलाग करणं आव्हानात्मक होतं. आज १९० धावांचा पाठलाग करताना आम्ही कमी पडलो. कृणाल पांड्याच्या गोलंदाजीमुळे हा सामना फिरला. पुढच्या वर्षी आम्ही नक्कीच ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न करू. या संघात बरेत युवा खेळाडू होते. या खेळाडूंनी अनुभवी खेळाडू असलेल्या संघांना बरोबरीची लढत दिली. या प्रवसात बऱ्याच गोष्टी शिकत्या आल्या.”