Virat Kohli On Retirement: विराट कोहलीचं आयपीएल जिंकण्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे. गेल्या १७ वर्षांपासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ आयपीएलची ट्रॉफी जिंकण्याच्या प्रतिक्षेत होता. मात्र, ३ वेळा ट्रॉफीच्या जवळ येऊन थोडक्यात ट्रॉफी हुकली होती. यावेळी संघाला खेळाडूंची आणि नशिबाची साथ मिळाली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गेल्या १८ वर्षांपासून विराट कोहलीवर आपला विश्वास कायम ठेवला. अखेर या संघाने आयपीएलची ट्रॉफी उंचावली आहे.
स्पर्धेतील पहिल्या सामन्यापासून हा संघ चॅम्पियनसारखा खेळत राहिला. शेवटी या संघाने फायनलमध्येही चॅम्पियनसारखा खेळ केला. या स्पर्धेतील साखळी फेरीतील १४ सामन्यांपैकी ९ सामन्यांमध्ये विजय मिळवत १८ गुणांसह हा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी राहिला. क्वालिफायर १ आणि फायनलमध्ये पंजाब किंग्ज संघाला पराभूत करत या संघाने जेतेपदाची ट्रॉफी जिंकली आहे.
आयपीएल २०२५ स्पर्धेनंतर विराट निवृत्ती घेणार?

आयपीएल २०२५ स्पर्धा जिंकल्यानंतर विराट कोहली निवृत्तीची घोषणा करेल, अशी अफवा पसरली होती. पण अंतिम सामन्यानंतर त्याने स्पष्ट केलं आहे की, तो इतक्यात निवृत्तीची घोषणा करणार नाहीये.

काय म्हणाला विराट?

फायनल जिंकल्यानंतर विराट कोहली म्हणाला, “मी म्हटल्याप्रमाणे, गेल्या १८ वर्षांत मी या संघाला सर्वकाही दिलं आहे. काहीही झालं, तरी मी संघाशी एकनिष्ठ राहिलो. अनेकदा असे क्षण आले, जेव्हा माझ्या मनात वेगळे विचार येत होते पण मी या संघाशी एकनिष्ठ राहिलो. मी त्यांच्या मागे उभा राहिलो, ते देखील माझ्या मागे उभे राहिले. मी नेहमीच आरसीबीला आयपीएलची ट्रॉफी जिंकून देण्याचं स्वप्न पाहिलं आहे. कारण बंगळुरू माझ्या मनात आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे, शेवटच्या दिवसांपर्यंत मी या संघासाठी खेळणार आहे.” यावरून हे तर स्पष्ट झालं आहे की, विराट कोहली इतक्यात निवृत्त होणार नाही. तो अजूनही पूर्णपणे फिट आहे.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर या सामन्यात पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला १९० धावा करता आल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून विराट कोहलीने सर्वाधिक ४३ धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पंजाब किंग्ज संघाकडून शशांक सिंगने नाबाद ६१ धावांची खेळी केली. तर जोस इंग्लिशने ३९ धावांची खेळी केली. पंजाब किंग्ज संघाला १८४ धावा करता आल्या. हा संघ विजयापासून आणि आपल्या पहिल्या ट्रॉफीपासून ६ धावा दूर राहिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.