RCB vs PBKS, IPL 2025 Final Weather Update: आयपीएल २०२५ स्पर्धेतील अंतिम सामना पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना ३ जूनला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्याआधी क्रिकेट चाहत्यांचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे. या सामन्यावर पावसाचं सावट आहे. त्यामुळे सामना रद्दही होऊ शकतो. असं झाल्यास कोणता संघ आयपीएल २०२५ स्पर्धेच्या जेतेपदाचा मानकरी ठरणार? जाणून घ्या.

पंजाब किंग्ज संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी श्रेयस अय्यरकडे आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी रजत पाटीदारकडे आहे. दोन्ही संघ आपल्या पहिल्या जेतेपदाच्या प्रतिक्षेत आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने क्वालिफायर १ मध्ये पंजाब किंग्जला पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे पंजाब किंग्जने क्वालिफायर २ मध्ये मुंबई इंडियन्स संघाला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

जर पावसामुळे सामना रद्द झाला तर?

क्वालिफायर २ चा सामना देखील याच मैदानावर पार पडला. या सामन्यात देखील पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे ७:३० ला सुरू होणारा सामना ९:४५ ला सुरू झाला. बीसीसीआयने सामना सुरू करण्यासाठी अतिरिक्त १२० मिनिटं दिली आहेत. त्यामुळे सामन्यावेळी पाऊस पडला, तर १२० मिनिटांपर्यंत सामना सुरू झाल्यास एकही षटक कमी न करता २०-२० षटकांचा सामना खेळवता येऊ शकतो. १२० मिनिटे झाल्यानंतर षटकं कमी करायला सुरूवात होईल. पण जर पाऊस थांबलाच नाही, तर सामना दुसऱ्या दिवशी म्हणजे, ४ जूनला खेळवला जाऊ शकतो.

बीसीसीआयकडून प्लेऑफच्या सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला नव्हता. पण, अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. मात्र, यादिवशीही सामना होऊ शकला नाहीतर मग साखळी फेरीतील सामन्यांमध्ये गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या संघाला विजेता घोषित केले जाऊ शकते.

मुंबईला नमवत पंजाबची अंतिम फेरीत धडक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

क्वालिफायर २ चा सामना मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात पंजाब किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्स संघाकडून फलंदाजी करताना सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी प्रत्येकी ४४-४४ धावांची खेळी केली. तर जॉनी बेअरस्टोने ३८ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर मुंबई इंडियन्सने या डावात २०३ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करताना पंजाब किंग्जकडून कर्णधार श्रेयस अय्यरने सर्वाधिक ८७ धावांची खेळी केली. तर नेहाल वढेराने ४८ धावांची खेळी केली. यासह पंजाब किंग्जने हा सामना ५ गडी राखून आपल्या नावावर केला.